कोरेगाव – अतिवृष्टीमुळे कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून प्रशासनाने नुकसानीचे पीकनिहाय पंचनामे करावेत. हे पंचनामे वस्तुनिष्ठ असावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाकडे केली आहे.
संघटनेचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत साळुंखे, सलीम मुलाणी, देवराज झांजुर्णे, लक्ष्मण झांजुर्णे, यशवंत शिर्के व शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांची नुकतीच भेट घेऊन मागण्यांचे निवेदन केले. तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पंचनाम्यांविषयी शिर्के यांनी आक्षेप नोंदविले.
अनेक गावांमध्ये पंचनाम्यांची प्रक्रिया विनाविलंब सुरू ठेवण्याचे निर्देश दिले जावेत, अशी मागणी त्यांनी केली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने नुकसानीचे पंचनामे बांधावर जाऊन करावेत, अशी मागणी शिर्के यांनी केली. त्यावर, पंचनाम्याबाबत प्रशासन गंभीर असून प्रत्येक विभागाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. या कामाचा दैनंदिन आढावा घेतला जात असल्याचे सौ. नलावडे यांनी सांगितले.