-जगन्नाथ म. शास्त्री
ऐकें जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाही । तयाचें जियालें म्हणो काई । वरी मरण चांग ।।
ज्ञानेश्वरी “ज्ञानदीप लावू जगी’ या लेखमालेमध्ये आध्यात्मिक ज्ञानदीप लावण्याचा उद्देश आहे. ज्ञान आणि विज्ञान असे ज्ञानाचे प्रकार आहेत. व्यावहारिक आणि आध्यात्मिक ज्ञान या दोन्हीचाही समन्वय ज्ञानेश्वरी ग्रंथात आहे. ज्ञानेश्वरीसारखं व्यवहारज्ञान दुसऱ्या कोणत्याही ग्रंथामध्ये सापडणे अवघड आहे. आध्यात्मिक ज्ञान हा तर ज्ञानेश्वरीचा जिव्हाळ्याचा विषय.
मानवी समाज व्यावहारिक ज्ञानामध्ये गुंतलेला आहे. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात, आध्यात्मिक ज्ञानाची आवड नसलेला व्यक्ती प्राणीच आहे आणि अशा माणसाच्या जगण्यापेक्षा त्याचं मरणं चांगलं आहे. चैतन्याशिवाय जशी देहाला किंमत नसते त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय मनुष्याच्या जीवनाला अर्थ नाही.
माऊली म्हणतात,
शुन्य जैसें गृह । चैतन्येंवीण देह । तैसे जीवित तें संमोह । ज्ञानहीन ।।