अलंकापुरीत दिंड्यांचे आगमन : गुरू हैबतबाबांच्या महाद्वारातील प्रथम पायरी पूजनाने होणार सुरुवात
आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 724व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी अनेक गावागावांमधून निघालेल्या दिंड्या अलंकापुरीत पोहोचू लागल्या आहेत. दिंड्यांच्या आगमनामुळे अलंकापुरीतील धर्मशाळा, राहुट्या, मंदिरांमध्ये टाळ-मृदंगाचा नाद घुमू लागल्याने येथे भक्तीचे मळे फुलू लागले आहेत.
दरम्यान, बुधवारी (दि. 20) सकाळी 7 ते 9 या वेळेत पालखी सोहळ्याचे मालक वै. गुरू हैबतबाबांच्या महाद्वारातील प्रथम पायरी पूजनाने खऱ्या अर्थाने सोहळ्यास सुरुवात होणार असून संजीवन समाधी सोहळा सोमवारी (दि. 25) रंगणार आहे.
विधिवत व देवाब्राह्मणांच्या साक्षीने होणाऱ्या या पायरी पूजन सोहळ्यात पालखी सोहळ्याचे मालक व गुरू हैबतबाबांचे वंशज व मानकरी बाळासाहेब आरफळकर (पवार) यांच्यासह माउली मंदिराचे सर्व विश्वस्त, सेवेकरी मानकरी, दिंडीचालक, चोपदार, विणेकरी, आदींसह आळंदीतील सर्व पदाधिकारी, भाविक या पायरी पूजन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
आजचे धार्मिक कार्यक्रम –
संजीवन समाधी सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रमांना बुधवार (दि. 20) पासून सुरुवात होणार आहे. या सोहळ्यादरम्यान पहाटे नित्याच्या धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात माउलींना पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती होईल. पहाटे 5 ते सकाळी 11.30पर्यंत भाविकांच्या महापूजा होतील. दुपारी 12.30 ते 1 श्रींना महानैवेद्य दाखविला जाईल.
सायंकाळी 6.30 ते 8 योगीराज ठाकूर यांचे सुश्राव्य वाणीतून वीणा मंडपात कीर्तन होईल. रात्री 8 ते 8.30 धुपारती होईल. रात्री 9 ते 11 बाबासाहेब आजरेकर यांचे वीणा मंदिरात कीर्तन, रात्री 10 ते 12 वासकर महाराज यांचा हैबतराव बाबांच्या पायरीपुढे जागर, रात्री 12 ते 2 मारुतीबुवा कराडकर यांचा जागर, रात्री 2 ते पहाटे 4 हभप हैबतबाबा आरफळकर यांचा जागर. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून विविध व्यापारी येथे दहा दिवस व्यापार करतात या कालावधीत रोज कोट्यवधींची उलाढाल होते.
विना आमंत्रितांचा अलौकिक सोहळा
संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः सोलापूर (पंढरपूर) जिल्ह्यातून व्यापारी वर्ग दरवर्षी मोठ्या प्रमाणात येत असतो. शहरात सर्वत्र सोहळ्याची लगबग सुरू असून, काही ठिकाणी आपला ऊन, वारा, पावसापासून बचाव व्हावा म्हणून राहुट्या उभारण्याचे काम सुरू आहे. तर दर्शनबारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
येत्या काही तासातच राज्याच्या कानाकोपऱ्यातून मिळेल त्या वाहनांनी तसेच पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून लाखो भाविक येथे येऊन दाखल होतील. कारण हा विना आमंत्रितांचा अलौकिक असा भागवत धर्माची पताका उंचावून जगाला शांतीचा संदेश देणारा सोहळा आहे.
भक्तीचा मळा फुलला –
संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अलंकापुरीतील धर्मशाळा, राहुट्या, मंदिरे गजबजू लागली असून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, श्री ज्ञानदेव तुकाराम’, माउली माउली’, ज्ञानेश्वर महाराज की जय’च्या जयघोषाने अवघी अलंकापुरी भक्तिमय झाली आहे. तर इंद्रायणी तीरावर महिला वारकरी; तसेच तरुण वारकरी फुगड्या खेळण्यात दंग झाले आहेत. बाजारपेठेत तुळशीच्या माळा, पूजेचे साहित्य, खेळणी, आदी वस्तूंची दुकाने सजू लागली आहेत.