आळंदी – “अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपुत्र’ या भावनेने माउलींचे आशीर्वाद घेण्यासाठी वैष्णवांची मांदियाळी शनिवारी (दि. 23) आळंदीत अवतरली. निमित्त होते कार्तिकी एकादशीचे. सहभागी भाविकांनी ज्ञान, प्रेम अन् भक्तीचा अनुपम्य सोहळा डोळ्यांत साठवत माउलींवरील निस्सीम श्रद्धेचा जणू प्रत्ययच दिला. “ज्ञानोबा-माउली…’ असा जयघोष, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’चा नामगजर, टाळ, मृदंग, वीणेचा त्रिनाद आणि हरिनामाचा जयघोष करीत लाखो भाविकांनी कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले.
संजीवन समाधीवर विविधरंगी फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी होताच घंटानाद झाला आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी आळंदी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवारी सुमारे दोन लाख भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले.
माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत विविध कार्यक्रमांचे आयोजन संजीवन समाधी मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे. पहाटपूजेपूर्वी दर्शनबारीतील येणारी भक्तांची रांग माउलींच्या पवमान पूजेसाठी बंद ठेवण्यात आली. विविध सेवक, सेवाभावी संस्था आणि स्वकाम सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ केला. तर घंटानाद झाल्यानंतर पहाटपूजेत माउलींना अभिषेक व पूजा बांधण्यात आली. श्रींच्या पूजेचे पौरोहित्य प्रसाद जोशी यांनी केले. यावेळी त्यांच्यासह 11 ब्रह्मवृदांच्या वेदमंत्रोच्चाराने, सनई चौघड्यांचा मंजूळ स्वरामुळे देऊळवाड्यातील वातावरण भक्तिमय उत्साहाने भारलेले होते. दरम्यान सिद्धेश्वर मंदिरातही रुद्राभिषेक सुरू होता.
माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला. पंचामृत अभिषेक करताना दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे अत्तर यांचा वापर करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर माउलींना विविध आकर्षक वस्त्रे आणि दागिन्यांनी सजविण्यात आले. विद्युत रोषणाई आणि रंगावलीकारांनी काढलेल्या रांगोळ्यांनी आळंदी मंदिर परिसर आकर्षक दिसत होता. मध्यरात्री बारा वाजता बंद करण्यात आलेली दर्शनबारी पहाटे साडेतीननंतर पूर्ववत सुरू करण्यात आली होती. या कालावधीत दर्शन बारी सुमारे दीड किलोमीटर म्हणजेच वेतागेश्वर मंदिरापर्यंत जाऊन पोहोचली होती
माउली मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचे प्रथेप्रमाणे पालन करीत झाले. यात श्रींना महानैवेद्य झाल्यानंतर श्रींची पालखी मंदिरातून हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा दुपारी एक वाजता निघाली. दरम्यान, भाविक, वारकऱ्यांनी हरिनाम जयघोष करीत प्रदक्षिणेच्या मार्गावर दुतर्फा गर्दी करून श्रींच्या पालखीत दर्शन घेतले. हजेरी मारुती मंदिरात श्रींची पालखी काही वेळ विसावली. येथे परंपरेचे अभंग गायन, कीर्तन सेवेनंतर, हरीगजर, भाविकांचे दर्शन झाल्यानंतर पालखी रात्री मंदिरात चावडी चौकमार्गे परतली. मंदिरात प्रदक्षिणा झाल्यानंतर परंपरेने धुपारती झाली. त्यानंतर श्रींच्या पुढे संतोष मोझे (सरकार) यांच्या वतीने हरिजागर झाला.
पुजेप्रसंगी देवस्थांचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अजित कुलकर्णी, डॉ. अभय टिळक, मानकरी, दिंडेकरी, टाळकरी, विणेकरी,चोपदार, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष वैजंयता उमगेरकर, अशोक कांबळे, नगरसेवक सचिन गिलबिले, सागर भोसले, गणेश रहाणे, सचिव अजित वडगावकर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सागर बोरुंदिया, डी. डि. भोसले पाटील, बाळासाहेब चोपदार, मानकरी दिनेश कुऱ्हाडे, योगिराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर पाटील, अनिल कुऱ्हाडे, योगेश आरु, आळंदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र चौधर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक यांच्यासह भाविक, निमंत्रित उपस्थित होते.
स्वयंसेवी संस्थांसह आळंदी ग्रामीण रुग्णालयाने आरोग्यसेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली होती. तर देवस्थानतर्फे भाविकांच्या स्वागताची तयारी, सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शांतता सुरक्षिततेसाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने अनुचित प्रकार घडला नाही.
पुष्पसजावटीमुळे माउलींचे रूप लोभसवाणे – इंद्रायणी नदीचा तीर माउली नामाच्या अखंड गजरात अक्षरशः बुडून गेला होता. थंडीची तमा न बाळगता अनेक भाविक नदीत स्नान करून स्वतःला पवित्र मानत होते. पहाटेचे थंड वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात माउलींच्या समाधीला पवमान अभिषेक करण्यात आला.
घंटानाद झाल्यानंतर मध्यरात्री पाऊण ते पावणेदोन वाजेपर्यंत माउलींना अभिषेक व पूजा बांधण्यात आली. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवल्यानंतर श्रींना तुळशीच्या माळा, गुलाबपुष्प, अत्तर व इतर विविध रंगीबेरंगी सुवासिक फुलांनी सजविण्यात आले होते. त्यामुळे हे रूप लोभसवाणे दिसत होते.
सातारा जिल्ह्यातील जाधव दाम्पत्यास यंदा मान आळंदीतील कार्तिकी यात्रेत दर्शनबारीतील प्रथम वारकरी कुटुंब दर्शनार्थी म्हणून यावर्षी सातारा जिल्ह्यातील शेतकरी शिवाजी जाधव आणि सुनंदा जाधव या दाम्पत्यास मिळाला. त्यांना प्रथम दर्शनासह “श्रीं’च्या गाभाऱ्यात देवदर्शन आणि सत्कार नारळ प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. जाधव दाम्पत्य म्हणाले की, गेली 25 वर्षांपासून आम्ही वारी करीत आहोत, आज खऱ्या अर्थाने माउलींनी आम्हाला पदरात घेतले हेच आजवर केलेल्या वारीचे फलित माउलींनी दिले.
“श्रीं’चा आज रथोत्सव – द्वादशीदिनी रविवारी (दि. 24) पहाटे 2 ते 3.30 श्रींना पवमान अभिषक व दुधारती होणार आहे. यानंतर 3.30 ते 4 या वेळेत प्रभारी प्रांताधिकारी संजय तेली यांच्या हस्ते पंचोपचार पूजा होईल. यानंतर भाविकांच्या महापूजा आणि दर्शनासाठी श्रींचा गाभारा खुला होईल. सायंकाळी चारच्या सुमारास श्रींचा रथोत्सव होणार आहे. यावेळी श्रींची पालखी खांद्यावर घेत हरिनाम गजरात गोपाळपुरास रवाना होईल. श्रीकृष्ण मंदिरातून पूजा, आरतीनंतर श्रींचे रथोत्सवास सुरुवात होणार आहे. दरम्यान, मंदिरात हभप हरिभाऊ बडवे यांच्या वतीने कीर्तन सेवा, नगरप्रदक्षिणा करून श्रींचे रथोत्सवातील पालखीचे मंदिरात आगमन होणार आहे.
मंदिर प्रदक्षिणेनंतर धुपारती होणार आहे. तर रात्री 9 ते 11 वीणा मंडपात हभप केंदूरकर महाराज यांच्या वतीने कीर्तन, रात्री 11 ते 12 पासधारकांना खिरापत पूजा, प्रसाद वाटप होत आहे. यावेळी फडकरी, मानकरी,दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप श्रींच्या गाभाऱ्यात होणार आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
ईपेपर । राशी-भविष्य । लोकसभा निवडणुक । Trending
Copyright © 2022 Dainik Prabhat