चेन्नई – तमिळनाडूतील द्रमुक आघाडीने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने लढा सुरू केला आहे. त्या लढ्याला मोदींनी सन्मान दिला पाहिजे. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि ते तीन काळे कायदे त्वरित मागे घेतले पाहिजेत असे द्रमुक पक्षाने म्हटले आहे.
द्रमुक आघाडीतील पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्धीला दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशातील पाचशे शेतकरी संघटनांनी एकत्रितपणे देशातील 62 दशलक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी एकजुटीने हे आंदोलन सुरू केले आहे.
हुकूमशाही पद्धतीने ते आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. शेतकऱ्यांशी केवळ बुरारी मैदानावरच चर्चा केली जाईल हे भाजप सरकारचे म्हणणे तर्कशुन्य आहे. शेतकऱ्यांशी चर्चा टाळण्याचाच सरकारचा हा प्रयत्न आहे असेही त्यांनी म्हटले आहे.