चेन्नाई – तामिळनाडुत द्रमुक पक्षाने सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या विरोधात व्यापक सह्यांची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडुत एनपीआर किंवा एआरसी लागू करू दिली जाणार नाही असा इशाराही द्रमुक पक्षाने दिला आहे. केंद्र सरकारने सीएए कायदा त्वरीत मागे घ्यावा अशी मागणीही या पक्षाने केली आहे.
या संबंधात राज्यातील जनतेच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्याचे निवेदन केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना पाठवले जाणार आहे असे त्यांनी म्हटले आहे. द्रमुक आणि मित्र पक्षांच्या आज झालेल्या एका संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला कॉंग्रेस आणि एमडीएमके या पक्षाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. 4 ते 8 फेब्रुवारी या अवधीत ही स्वाक्षरी मोहीम राज्यभर राबवली जाणार असल्याचे स्टॅलिन यांनी पत्रकारांना सांगितले.