पुणे – यावर्षी दिवाळी नेहमी प्रमाणे चार दिवसांची नसून नरक-चतुर्दशी आणि दर्श अमावस्या लक्ष्मीपूजन (27 ऑक्टोबर) रविवारी एकाच दिवशी, सोमवारी (दि.28), दिवाळी पाडवा आणि मंगळवारी (दि.29) भाऊबीज अशी तीन दिवसांचीच आहे, असे शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी एका पत्रकाने कळविले आहे.
दिवाळीच्या नरक चतुर्दशीचे दिवाळीचे पहिले पहाटेचे अभ्यंगस्थान ब्राह्ममुहूर्त पहाटे 4.30 ते चंद्रोदय 5.30 या मुहूर्तावर रविवारी पहाटेच करणे सर्वोत्तम. याच दिवशी दुपारी 12.23 वाजतांच दर्श अमावास्या सुरू होत असल्याने लक्ष्मीपूजन रविवारीच सायं.6.06 ते रात्री 8.37 या सर्वोत्तम मुहूर्तावर करावे, असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी (28 ऑक्टोबर) अमावास्या सकाळी 9.08 पर्यंत असल्यामुळे दिवाळी पाडव्याचे-नव विक्रम वर्षारंभाचे मंगलस्नान सकाळी 9.09 नंतरच करावे. पत्नीने पतीला स्नान घालून ओवाळण्याचा दिवाळी भेट घेण्याचा कार्यक्रम सकाळी 9.10 नंतरच दिवसभरात केव्हाही करावा, असेही गाडगीळ यांनी पत्रकात नमूद केले आहे.