मुंबई – राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने हॉटेल, उपहारगृह आणि दुकानांच्या वेळ मर्यादा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय झाला. यामुळे यंदाची दिवाळी बऱ्याच अंशी निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे.
करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज करोना टास्कफोर्ससोबत बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या आहेत.
दुसरी लाट संथ झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे. याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी हॉटेल आणि दुकानांची वेळ मर्यादा वाढवण्याचा निर्णय झाला. तसेच 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृहांसोबत अम्यूझमेंट पार्कही सुरू होणार आहेत. तसेच दुकानांच्या वेळा वाढवून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत.
तसेच अम्युझमेंट पार्कमधील वॉटर पार्कशिवाय अन्य उपक्रमांना परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येईल. तसेच कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकूनगुन्या यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.