मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी होणार असून राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. याबाबत निर्णय झाल्यास राजस्थान, ओरिसा आणि सिक्कीम पाठोपाठ महाराष्ट्रात दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली जाऊ शकते.
यासंदर्भात टास्क फोर्स आणि डेथ ऑडीट कमिटीची राजेश टोपे यांनी बैठक घेतली. दिवाळीनंतर थंडीत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
राजेश टोपे म्हणाले, आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करावा. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. तसेच करोनात श्वसनाला त्रास असल्याने यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी, अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे.
राज्यात केरोनाची दुसरी लाट शक्यता येणार नाही. मात्र संभाव्य लाटेसाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. सध्या राज्यात करोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यात खंड पडणार नसून त्याउलट अधिक प्रभावीपणे 500 लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार
थंडीमध्ये इन्फ्लुएन्झा सारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचविले आहे.
त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार आहे. लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयूमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना सिम्युलेशन लॅबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.