ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक, “माणूस’ या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक श्री. ग. माजगावकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म बडोदा येथे 1 ऑगस्ट 1929 रोजी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे स. प. महाविद्यालयात झाले. त्यांनी बी.ए. व एम.ए.पदव्या प्राप्त केल्या होत्या. त्यांची पत्रकारिता निर्भीड होती तसेच पक्षपाती नव्हती.
1977च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर माजगावकर दिल्लीत जाऊन इंदिरा गांधींची दीर्घ मुलाखत घेणारे पहिले पत्रकार होते. 1977चे जयप्रकाश लाटेत जनता पक्ष विजयी झाला, त्यावेळी पक्षातील लाथाळी पाहून ते म्हणाले होते, इंदिराजींना कमी लेखू नका, त्या परत सत्तेवर येतील. त्यांचे हे भविष्य नव्हते तर अभ्यासपूर्ण अचूक अंदाज होता. त्यांनी स्वतःचे मुद्रणालय स्थापन केले. ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक असे विविध विषयांचे लेख प्रसिद्ध करायचे. प्रतिथयश लेखकांबरोबर नवोदित लेखकांना त्यांनी संधी दिली. मोठ्या माणसांबद्दल टिंगलवजा लिहू नये असा त्यांचा कटाक्ष होता. खोटी टीका किंवा भावुक स्तुती त्यांना मान्य नव्हती. सामान्य माणसाला समजेल अशा रीतीनं लेखन असावे असा आग्रह असे.
शरद जोशींचे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले. त्याच वेळी शेतीविकास, ग्रामविकास या विषयावर माजगावकर अभ्यास करू लागले. शेती अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे तसेच प्रत्यक्ष आंदोलन करणारे यांचेशी त्यांनी संवाद साधला व शेती प्रश्नांवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले व त्यामुळे मध्यमवर्गीय वाचकांना शेतीमधील अडचणी समजल्या. नवोदित लेखक किंवा वार्ताहर यांना मार्गदर्शन करायचे, लेखकाची आवड क्षमता पाहून ते त्यांना विषय देत असत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 1952 मध्ये “राजहंस’ची स्थापना केली. श्री. ग. माजगावकर राजहंसला येऊन मिळाले. बाबासाहेब पुरंदरे त्यांचे मेहुणे. पुढे दोघांच्या प्रयत्नातून ही प्रकाशन संस्था वाढत गेली. राजहंस प्रकाशनतर्फे सामाजिक, विज्ञान, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, राजकीय, ऐतिहासिक चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या असे बहुविध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली.
भारतातील राजकीय व सामाजिक विषय हाताळताना प्रत्यक्ष जागेवर पत्रकार पाठवून वार्तांकन घेत असत. आंध्रमधील नक्षलवादी चळवळ, बिहारमधील चळवळ, केरळात मार्क्सवादी आणि संघवाले यांच्यातील संघर्ष, बंगालमधील मार्क्सवादी चळवळ यांच्या मुळाशी जाऊन माहिती घेण्यासाठी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले व वस्तुस्थिती वाचकांपर्यंत पोहोचविली. आयुष्यभर निर्भीड निःपक्षपाती पत्रकारिता करीत असतानाच 20 फेब्रुवारी 1997 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
माधव विद्वांस