माधव विद्वांस
भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळविणारे भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रमण यांचे आज पुण्यस्मरण. (निधन 21 नोव्हेंबर 1970) त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते तसेच त्यांना संगीताची व संस्कृतची आवड होती. माध्यमिक शिक्षण तिरुचिरापल्ली येथे पूर्ण झाल्यावर 1902 मध्ये चेन्नई येथे पुढील शिक्षणासाठी गेले. तेथे त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि 1904 मध्ये भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांक मिळवून बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. 1907 मध्ये त्यांनी विशेष प्राविण्यासह एम.ए. पदवी मिळविली.
त्यांचे मोठे भाऊ इंडियन अकाउंटिंग सर्व्हिसमध्ये अधिकारी होते. चंद्रशेखर यांनीही त्याच विभागात काम करण्यासाठी स्पर्धा परीक्षा दिली व उत्तीर्णही झाले. त्यानंतर कलकत्तामध्ये सहाय्यक लेखापाल जनरल पदावर रमण यांची नेमणूक झाली. त्यांना विज्ञानात संशोधनाची कामे करायची ओढ होतीच. एके दिवशी कार्यालयातून घरी परत येत असताना त्यांना “इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स’चा बोर्ड दिसला आणि लगेचच ते तेथे गेले. यानंतर रमण यांनी भारतीय विज्ञान परिषदेच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्यास सुरुवात केली. दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचे आणि सकाळी आणि संध्याकाळी प्रयोगशाळेत काम करायचे असा रमण यांचा दिनक्रम. पण काही दिवसांनी रमण यांची ब्रह्मदेशच्या रंगून शहरात बदली झाली. त्यांचे रंगूनमध्ये मन लागेना. कारण तेथे प्रयोग करण्याची सुविधा नव्हती. त्याच वेळी रमणच्या वडिलांचा मृत्यू झाला. ते सहा महिन्यांच्या सुट्टीसाठी चेन्नईला गेले.
काही दिवसांसाठी त्यांची नागपूरला बदली झाली. त्यानंतर कलकत्ता येथे महालेखापालपदी पदोन्नती झाली. कलकत्ता येथे परिषदेच्या प्रयोगशाळेत पुन्हा संशोधन करण्याची संधी मिळाल्याने रमण यांना आनंद झाला. ते पुढील सात वर्षे या प्रयोगशाळेत संशोधन करत राहिले. डॉ. रासबिहारी घोष आणि सर आशुतोष मुखर्जी यांच्या प्रयत्नाने कलकत्ता येथे एक विज्ञान महाविद्यालय सुरू झाले. तेथे विज्ञानाला वाहून घेण्यासाठी अधिकार व मोठा पगार सोडून कमी पगारावर प्राध्यापकपदावर जाणे त्यांनी पसंत केले.
1917 मध्ये लंडनमध्ये ब्रिटिश कॉमनवेल्थच्या विद्यापीठांची परिषद झाली. त्या परिषदेत रमण यांनी कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. त्यांची ही पहिली परदेशी यात्रा होती. या परदेशी सहलीदरम्यान, त्यांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण घटना घडली. बोटीतून जात असताना आकाशाचा रंग आणि समुद्राचा रंग वेगळा आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यावर अभ्यास करून त्यांचे सहकारी के. एस. कृष्णन यांच्यासमवेत, प्रकाश पसरण्यावर प्रयोग सुरू केला, त्यातून समुद्राचा निळा रंग हे आकाशाचे प्रतिबिंब नव्हे तर परिवर्तन होताना प्रकाशाच्या काही भागाची तरंग लांबी बदलते म्हणून हा रंग वेगळा आहे हे दाखवणारा सिद्धांत त्यांना सापडला. तोच रमण इफेक्ट म्हणून प्रसिद्ध झाला. 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी हे नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केले. यामुळे 28 फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.