मुंबई – आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. नव्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात १३ नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, आज नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विधानभवनात येताच विरोधकांनी आयाराम गयाराम, जय श्रीराम या घोषणा दिल्या. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री असे चित्र निर्माण झाले होते.
गेली साडेचार वर्षे रखडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार आज पार पडला. यामध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपने आयात केलेले राधाकृष्ण विखे-पाटील, मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे “घड्याळ’ उतरवून शिवसेनेत प्रवेश केलेले बीडचे माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आयाराम गयाराम जय श्रीराम, विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग, आले रे आले चोरटे अशा घोषणा दिल्या.