तीन लाख नागरिकांना टॅंकरने पाणी : 15 हजार जनावरे छावण्यांमध्ये
सम्राट गायकवाड
आचारसंहिता शिथिल करण्याची आवश्यकता दरम्यान, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळाची दहाकता वाढत चालली आहे. येत्या मे आणि जून महिन्यामध्ये दाहकता अधिक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिक उपाययोजना व निर्णय शासनाला घ्यावे लागणार आहेत. मात्र, निर्णय घेताना निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे केले जाऊ शकते. वास्तविक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करून दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा, चारा छावण्यांसह नागरिकांना आवश्यक ती सर्वोतपरी मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सातारा – जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली असून आता त्याची झळ महाबळेश्वर तालुक्यालाही बसली आहे. सध्या महाबळेश्वरसह जिल्ह्यातील सर्वच 11 तालुक्यांमधील तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर माण तालुक्यामधील 10 चारा छावण्यांमध्ये 15 हजारांपेक्षा अधिक जनावरांचा समावेश झाल्याची माहिती समोर आली आहे.
निसर्गाने कायम दुष्काळ माथी मारलेल्या माण, खटाव, कोरगाव व फलटणसह धरणांचे तालुके असलेल्या पाटण, महाबळेश्वर, सातारा, वाई, जावली, कराड तालुक्यांना देखील सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ, आचली, करोशी, भिमनगर गावातील 1 हजार 665 नागरिकांना 4 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील 4 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरी व अंब्रुळकरवाडीसाठी देखील अधिग्रहीत करण्यात आलेल्या एका विहिरीतून दोन टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
जावली तालुक्यातील मुकवली, बामणोली दंडवस्ती, बामणोली सावरी आणि रूईघर नजीक गणेशपेठ आदी. वाड्यावस्त्यांना अधिग्रहीत करण्यात आलेल्या तीन विहीरीतून सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष बाब म्हणजे, वरील तीन तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात कोयना धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. वाई तालुक्यात मांढरदेव, गडगेवाडी, बालेघर, बोपर्डी-धनगरवाडी, गुंडेवाडी, ओहळी, चांदक, मोहडेकरवाडी आदी. गाव आणि वाड्यावस्त्यांवर दहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा तालुक्यातील अवाडवाडी गावासाठी दोन टॅंकरने तर कराड तालुक्यातील काले मंडल अंतर्गत मनू आणि कोळे मंडलअंतर्गत बामणवाडीसाठी चार टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.
फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, ठाकूरकी-गोळेगाव पुर्नविसत, कुरवली खुर्द, मिरगाव, गोळेवाडी, तावडी, पिराचीवाडी, वाठार निं., घाडगेवाडी, आरडगाव, चव्हाणवाडी, सासवड, चांभारवाडी, घाडगेमळा, नांदल, सुरवडी, आदी.गावांमध्ये 38 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडीसाठी दोन टॅंकरने तर कोरेगाव तालुक्यातील जायगाव, चिलेवाडी, बोधेवाडी, हासेवाडी, भाडळे, नागेवाडी, होलेवाडी, रूई, वाठार स्टेशन, फडतरवाडी, गुजरवाडी, जाधववाडी, तळीये, मोरबंद, जगतापनगर, नायगाव, पिंपोडे बुद्रुक, सोळशी, विखळे, तडवळे,चवणेश्वर, भावेनगर, नांदवळ व देऊर, भंडारमाची, अनभुलेवाडी,भाटमवाडी,रामोशीवाडी,शेल्टी आदी.गावांना 31 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
माण तालुक्यातील तब्बल 67 गावांना 95 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून त्यामध्ये पांगरी, बिजवडी, बिदाल, तोंडले, वडगाव, येळेवाडी, जाधववाडी, मोगराळे, पाचवड, दहिवडी, महिमानगड, स्वरूपखानवाडी, उर्किडे, दिवडी, कोळेवाडी, राजवडी, हस्तनपूर, अनभूलेवाडी, वावरहिरे, शिंगणापूर, शिरताव, हिंगणी, धुळदेव, गंगोती, वाकी, पिंपरी, पळशी, पिंगळी बुद्रुक, गोंदवले बुद्रुक, जाशी, भालवडी, खडकी, भाटकी, रांजणी, वरकुटे-म्हसवड, कारखेल, संभूखेड, इंजबाव, हवालदारवाडी, पर्यंती, मार्डी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, शेणवडी, विरळी, पानवण, जांभुळणी, कुरणेवाडी, वळई, वरकुटे मलवडी, चिलारवाडी, पुळकोटी, वारूगड, शिरवली, काळचौंडी, मलवडी, परकंदी, टाकेवाडी, बोडके, आंधळी, पांढरवाडी, शिंदी बुद्रुक, कासारवाडी, कुकुडवाड, पुकळेवाडी, ढाकणी आदी. गावांचा समावेश आहे.
खटाव तालुक्यातील गारवडी- आवळेपठार, मांजरवाडी, मोळ, नवलेवाडी, मांडवे, नागाचे कुमठे, पेडगाव, गोसाव्याचीवाडी, सातेवाडी, मायणी, गुंडेवाडी, मोराळे, धोंडेवाडी, दातेवाडी, कलेढोण, गारूडी, अनफळे, कानकातरे, पडळ, पाचवड, ढोकळवाडी, विखळे, मुळीकवाडी, तरसवाडी, कातरखटाव, शिंगाडवाडी, एनकुळ, तडवळे, डांबेवाडी, येलमरवाडी, कणसेवाडी, पळसगाव, खातवळ, रेवलकरवाडी, आवारवाडी, कटगुण, धावडदरे, भांडेवाडी, निमसोड, पुसेसावळी, थोरवेवाडी, जायगाव आदी.38 गावांना 31 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
दरम्यान, माण तालुक्यात जनावरांसाठी शासनाच्यावतीने नऊ तर माणदेशी फाऊंडेशनच्यातीने एक अशा दहा चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. चारा छावण्यांमध्ये लहान-मोठी अशी 15 हजार 620 जनांवरांचे संगोपन केले जात आहे. म्हसवड येथे माणदेशी फाऊंडेशनच्यातीने उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये सध्या 1 हजार 758 लहान तर 7 हजार 902 मोठी जनावरे आहेत. शासनाच्यावतीने आंधळी येथे उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये 103 लहान तर 737 मोठी जनावरे आहेत. तसेच मोगराळे येथे 45 लहान तर 252 मोठी जनावरे, बिजवडी येथील छावणीत 41 लहान तर 514 मोठी जनावरे, भाटकी येथील छावणीत 204 लहान तर 743 मोठी जनावरे, माळवाडी येथील छावणीत 182 लहान तर 840 मोठी जनावरे, शेणवडी येथील छावणीत 71 लहान तर 397 मोठी जनावरे, पाचवड येथील छावणीत 40 लहान तर 386 मोठी जनावरे, भालवडी येथील 129 लहान तर 939 मोठी जनावरे आणि जाधववाडी येथे उभारण्यात आलेल्या छावणीत 36 लहान तर 301 मोठी जनावरांचे संगोपन केले जात आहे. मोठ्या जनावरांना रोज 15 किलो तर लहान जनावरांना साडेसात किलो हिरवा चारा दिला जात आहे. त्याचबरोबर आठवड्यातून तीन वेळा पशुखाद्य, वाळलेला चारा पुरविला जात आहे.