रवींद्र कदम
आघाडी सरकारला कायदा सुव्यवस्थेबाबत गांभीर्य नाही : तीन मंत्री असूनही जिल्हा दुर्लक्षित
नगर – भौगोलिकदृष्ट्या आकाराने मोठा अशी नगर जिल्ह्याची ओळख आहे. त्याच प्रमाणात जिल्ह्यात गुन्हेगारीही फोफावत चालली असून जिल्ह्यात अवैध धंद्यासह आता ताब्यात असलेले गुन्हेगारही पोलिसांच्या हाती तुरी देत असल्याने जिल्ह्यात पूर्णवेळ पोलीस अधीक्षक कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच महापालिकेत आर्थिकदृष्ट्या नाजूक स्थितीमुळे दिवाळखोरी असलेल्या महापालिकेला आता अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वानवा निर्माण झाला आहे.
त्यामुळे आहे त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर महापालिकेचा गाडा चालविण्यात येत आहे. सध्या महापालिका आयुक्तांसह तब्बल तेरा विभागांचा कारभार हा प्रभारी पदभार असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत चालविला जात असल्याने महापालिकेचा डोलारा हा प्रभारी राजवर उभा असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीन मंत्री असूनही जिल्ह्या प्रभारी राजवर चालू असल्याने सरकारचे दुर्लक्ष झाले असल्याचे बोलले जात असून जिल्ह्यात पोलीस अधीक्षक व महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
याबाबत अनेक संघटनाकडून जिल्ह्याला पूर्णवेळे पोलीस अधीक्षक व महापालिकेला आयुक्त द्यावा अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनीही निवेदन घेवून या निवेदनांना केराची टोपलीच दाखवली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कदाचीत जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेबाबत गांभिर्यने घेत नसल्याने या पदांवर प्रभारीराज सुरु आहे.
मात्र जिल्ह्यात आनखी तीन मंत्री पदेबहाल झाली असून आमदार बाळसाहेब थोरात यांच्याकडे महसूलमंत्री तर शंकरराव गडाख त्यांच्याकडे जलसंधारण मंत्रीपद असून आमदार प्राजक्त तनपूरे यांच्याकडे नगर विकास खाते आहे. विशषेत: जिल्ह्यासह राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असूनही जिल्ह्याला पूर्णवेळ पोलीस अधीक्षक व मनपाला आयुक्त मिळत नसल्याने ही शोकांतीकाच मानावी लागेल.
शहरासह जिल्ह्यात भुरट्या चोऱ्या, रस्तालुट, हाणामाऱ्याच्या घटना घडत असतांना नुकताच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पकडलेला आरोपी कोतवाली पोलीसांच्या तावडीतून पळून गेल्याची घटना ताजी असतांनाच कर्जत येथे उपकारागृहातून खून, बलात्कार यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याले आरोपींनी पलायन केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे जिल्ह्याला पूर्णवेळे पोलीस अधीक्षकांची गरज आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हाच्या आलेखात वाढ होत आहे. मात्र झालेले गुन्हाचा तपासाचा उलगडा होताना दिसत नाही. तसेच दिवसा दरोडे, सोनसाखळी, घरफोडी, वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक पोलीस हे अपयशी ठरत आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी ही आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.
तसेच महापालिकेत एका अधिकाऱ्यांवर दोन ते तीन विभागांचे कामकाज असल्याने तो आपल्या सोईनुसार कामांना प्राधान्य देत आहे. परिणामी महापालिकेच्या बहुतांशी कामांचा बोजवारा उडाला आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वेच्छानिवृत्तीचा सपाटा महापालिकेत सुरू आहे. नुकतेच प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याकडे आता शहर अभियंत्यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
अधिच महापालिकेला प्रभारी आयुक्त आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. द्विवेदी आपल्या सोईनुसार महापालिकेचे कामकाज पाहत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेवून आपल्या फाईलीवर स्वाक्षरी घ्यावी लागत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामाला विलंब होत आहे. सहाय्यक आयुक्तपदासह नगरसचिव या दोन्ही पदाचा पदभार एस.बी तडवी यांच्याकडे आहे.
तडवी यांना मुळपदाचे काम सांभाळून सहाय्यक आयुक्तपदासह नगरसचिवचे काम पाहावे लागत आहे. विद्युत विभाग प्रमुख हे पद महापालिकेत वादग्रस्त ठरले आहे. कनिष्ठ अभियंता के. वाय. बल्लाळ यांच्याकडे या पदभार देण्यात आला आहे. त्यांनी हे पद नाकारले असतांनाही हे पद त्यांना देण्यात आले आहे. अर्थात त्यांना या पदाचे कळू अगर न कळू पण ते हे पद करायचे काम म्हणून करीत आहे. त्यामुळे नगर शहरातील विद्युत दिव्यांच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. त्यांना आपले मुळ काम सांभाळून संपूर्ण प्रभागाचे काम करण्याची वेळ आली आहे.
प्रभाग अधिकारी प्रभाग 1 चे जितेंद्र सारसर, प्रभाग 2 चे ए.डी. सोनवणे, प्रभाग 3 चे ए.डी. साबळे, प्रभाग 4 अधिकारी नानासाहेब गोसावी असे चारही अधिकारी प्रभारीच आहेत. उद्यान विभाग प्रमुख हे पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे लिपीक असलेल्या शशिकांत नजन यांच्याकडे या विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन हे पद देखील रिक्त असून त्यांची जबाबदारी आरोग्यअधिकारी अनिल बोरगे यांच्याकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचा बट्याबोळ उडाला असून रक्त पेढी ही वादाच्या भवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी जिल्ह्याला पूर्णवेळ पोलीस अधीक्षक व महापालिकेला आयुक्त देण्याची गरज व्यक्त होत आहे.
मनपा आयुक्त, पूर्णवेळ पोलीस अधीक्षक देणार : मुश्रीफ
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी संपर्कसाधला असता ते म्हणाले की, लवकरात लवकर महापालिकेला पूर्ण वेळे आयुक्त व जिल्ह्याला पोलीस अधीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.