पालकमंत्र्यांकडून टंचाईचा आढावा; खेपा नियमित करण्याचे प्रशासनाला निर्देश
नगर: पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने 35 विहिरी, 55 बोअरवेल अधिग्रहण करून 777 टॅंकरच्या माध्यमातून 12 लाख जनतेची तहान भागवत आहे. तसेच विविध गावे आणि वाड्यावस्त्यांवर टॅंकर्सद्वारे होणारा पिण्याचा पाण्याचा पुरवठा नियमित व्हावा. ठरवून दिलेल्या खेपा 100 टक्के होतील, याकडे यंत्रणांनी लक्ष देण्याचे निर्देशे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांचा टंचाई आढावा बैठक सोमवारी (दि.13) जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, टंचाई शाखेचे तहसीलदार जयसिंग भैसडे, अपत्ती व्यवस्थापनचे डॉ. वीरेंद्र बडदे, रोहयोचे विकास घिगे आदींसह जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थिती होते.
जिल्ह्यात सध्या बाराशे कामे रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असून, बारा हजारांवर मजुरांची या कामावर उपस्थिती आहे. कोणत्याही गावातून कामाची मागणी झाल्यास तीन दिवसांत संबंधितांना कामे उपलब्ध तरुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सध्या ग्रामपंचायतीमार्फत सुरु असणाऱ्या कामांवर 5 हजार 547 मजूर उपस्थिती असून, यंत्रणांमार्फत सुरु असलेल्या कामांवर 5 हजार 709 एवढी मजूर उपस्थिती आहे.
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, येणाऱ्या अडचणी, गावांची मागणी, विशेषता चारा छावणी, पाणी टॅंकर्स, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, बुडकी खोदणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, खाजगी विहीर अधीग्रहण, टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा, प्रगतीपथावरील नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे आणि तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, मागेल त्याला काम याप्रमाणे रोहयोच्या कामांचे शेल्फ तयार करणे आदी उपाययोजनांचा आढावा प्रा. शिंदे यांनी घेतला.
आतापर्यंत छावणीचालकांना 23 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. छावण्यांमध्ये असलेल्या पशुधनाची नियमित तपासणी करुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या.
3 लाख 60 हजार शेतकऱ्यांना कर्ज माफी
राज्य सरकारकडून दुष्काळ बाधित शेतकऱ्यांसाठी आलेले 400 कोटी रुपयांचे अनुदान 6 लाख 36 हजार 790 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हा प्रशासनाने दिली. 998 कोटींची कर्जमाफीचा लाभ फक्त 3 लाख 60 हजार शेतकऱ्यांना मिळाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
साहेब दीड हजार जनावरांना 20 हजार लिटर पाणी पुरेल कसे : सभापती भोर
साहेब.. माझ्या गावात चारा छावणीत एकूण दीड हजार जनावरे आहेत. त्यासाठी शासनाने 20 हजार लिटरचा एक टॅंकर मंजूर केले आहे. साहेब उन्हाळ्याची तीव्रता पाहता 1 हजार 500 जनावरांसाठी 20 हजार लिटर पाणी पुरेल कसे? यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेवून वेळोवेळी पाठ पुरावा केला. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. अधिकारी-कर्मचारी हे सभागृहात बसून कागदी घोडे नाचवत आहे. अशीच जर परिस्थिती राहिली, तर तालुक्यातील पशुधन वाचणार नाही, असे पंचायत समितीचे सभापती रामदास भोर म्हणाले.
पालकमंत्री यांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे
जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री यांनी टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नाची अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे न देता पळवाटा शोधत उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पालकमंत्री यांनी टंचाई बैठकीत खोटी उत्तरे देता की काय असे म्हणत अधिकारी, कर्मचारी चांगलेच धारेवर धरले.