प्रशांत जाधव
लेटलतीफांची वाढली डोकेदुखी; “तेजस्वी’ उपक्रमाचे कौतुक
सातारा – जिल्हा पोलिस दलातील विविध कार्यालयांतील व साईट ब्रॅंचमधील कर्मचाऱ्यांसाठी व मुख्यालयातील कारकुनांसाठी “बायोमेट्रिक’ हजेरी सुरू करण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षासह मुख्यालयातील इतर विभागांत ही यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे “लेटलतीफ’ आणि सेवेवर असल्याचे दाखवून खासगी कामे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची व कारकुनांची डोकेदुखी वाढली आहे.
अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करता यावी, यासाठी पोलिस खात्यातर्फे हा निर्णय घेण्यात आला असून, पोलीस दलातून या “तेजस्वी’ उपक्रमाचे कौतुक होत आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे किती पोलिस कर्मचारी किती तास काम करतात हे स्पष्ट होणार आहे. अपघात झाला, कोणती दुर्घटना घडली की पोलिसांना धावावे लागते. पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठाण्याच्या हद्दीतील इतर कामांमुळे तसेच कायदा सुव्यस्था राखण्यासाठी सतत कार्यरत राहावे लागते. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सध्या तरी या बायोमेट्रिक हजेरीतून सवलत मिळणार आहे.
मात्र, साईट ब्रॅंचला काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना व पोलीस मुख्यालयातील कारकुनांना दिवसातून दोन वेळा हजेरीचे बंधन घातले आहे. एखादी घटना घडल्यानंतर पोलिस कर्मचारी पोलिस ठाणे वगळून इतर कार्यालयात न येता घटनास्थळी पोहोचला आणि नंतर पोलिस ठाण्यात येऊन त्याने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावली तरी चालणार आहे; मात्र, उशिरा हजेरी लावण्याचे कारण देण्यासाठी रजिस्टर ठेवले जाणार आहे.
उशिरा हजेरी लावल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची कारणेही या रजिस्टरमध्ये लिहावी लागणार आहेत. त्याची पडताळणी कार्यालयाचे प्रमुख करणार आहेत. नियमित काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसह कारकुनांसाठी हे अवघड नाही; मात्र कामावर असल्याचे दाखवून खासगी काम करणारे कर्मचारी तसेच “लेटलतीफ’ कर्मचाऱ्यांवर मात्र बायोमेट्रिक हजेरी पद्धतीमुळे अंकुश येणार आहे.
प्रायिोगक तत्त्वावर इथे आहे “बायोमेट्रिक’ हजेरी
सध्या प्रायोगिक तत्वावर पोलीस नियंत्रण कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, पोलीस अधीक्षक व अप्पर अधीक्षक वाचक शाखा, पोलीस मुख्यालय या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पोलीस दलातील विविध कार्यालयांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व कारकुनांनी त्यांच्या कार्यालयात वेळेत यावे व वेळेतच परत जावे, यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. या हजेरीमुळे गैरहजर लोकांसह वेळेत न येणाऱ्यांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. कर्मचारी एका महिन्यात तीन वेळा त्याच्या कार्यालयात उशीरा आला तर त्याच्या अर्जित रजेतून शासनाच्या आदेशानुसार एक दिवस सुट्टी कापली जाणार आहे.
तेजस्वी सातपुते , पोलीस अधीक्षक.