खोटी माहिती दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागवला खुलासा
सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रियेत सहा उमेदवारांनी खोटी प्रतिज्ञापत्रे दिल्याचे अर्जांच्या छाननीत निष्पन्न झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, अशा कारणेदाखवा नोटिसा बजावल्या आहेत. संबंधितांकडून सात दिवसांत खुलासा मागवण्यात आला आहे. समाधानकारक खुलास न आल्यास संबंधितांच्या संभाव्य नोकरीवर गंडांतर येणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेतील पाच वर्षे रखडलेली अनुकंपा भरतीवरील प्रक्रिया जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या पुढाकाराने 80 उमेदवारांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर संभाव्य उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आली.
या उमेदवारांपैकी कुंभारगाव, ता. पाटण येथील शबाना दिलावर मुल्ला यांची आई श्रीमती सलमा मुल्ला उपशिक्षक (चाळकेवाडी कुंभारगाव -2) पदावर कार्यरत असतानाही त्या घरकाम करत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे शबाना व सलमा मुल्ला यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सदरबझार, सातारा येथील ऐश्वर्या महेश घोंगडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रात आई शासकीय सेवेत असल्याचे तर प्रतिज्ञापत्रात घरकाम करते, असे म्हटले आहे. अर्जात अविवाहित असल्याचे म्हटले असताना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. वर्ये, ता. सातारा गणेश सुभाष ननावरे यांनी स्वयं घोषणापत्रात दोन अपत्ये असल्याचे म्हटले आहे.
प्रत्यक्षात त्यांना तीन अपत्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. उंबरीवाडी, ता. जावळी येथील विजय जानू जाधव यांनीही प्रतिज्ञापत्रात दोन अपत्ये असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात त्यांना तीन अपत्ये आहेत. वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील प्रतीक दिलीप रसाळ यांनी विनंती अर्ज व इतर कागदपत्रांमध्ये दहावी नापास असल्याची माहिती दडवल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.