औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊन करण्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर फिरत होते. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लॉकडाऊनसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
सध्या सुट्टीवर असलेले सुनील चव्हाण म्हणाले की, मी रविवारी रूजू होईल. त्याच दिवशी संध्याकाळी मनपा आणि पोलिस प्रमुखांच्या उपस्थित बैठक होईल. लोकांच्या डोक्यात दगड घातल्याप्रमाणे कोणताही निर्णय होणार नाही. लॉकडाऊन संदर्भात निर्णय एकट्याने घेतला जात नसतो. जनतेला त्रास सहन करावा लागल, असा निर्णय होणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यात संसर्ग किती प्रमाणात वाढला, हे पाहूनच निर्णय होणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हात पॉझिटीव्ह रुग्णांचा दर आता १२ ते १५ टक्क्यांवर गेला आहे. दररोज २००० चाचण्या होतात. २ ते ५ टक्के रुग्णवाढीचा दर असेल तर करोना संसर्ग अटोक्यात असल्याचं मानलं जातं. मात्र आता अचानक रुग्णवाढ झाल्यामुळे चिंताही वाढली आहे. या संदर्भात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे म्हणाले की, लॉकडाऊनबद्दल तूर्तास कोणताही निर्णय झालेला नसल्याचे म्हटले. तसेच सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर परिस्थिती नुसार निर्णय घेतला जाईल. निर्णय घेतल्यानंतर पत्रकार परिषदेतून जाहीर करू असंही गव्हाणे यांनी सांगितलं.