नगर – कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून सर्वांच्याच जीवाची काळजी निर्माण झाली आहे. त्यातही केवळ सुरक्षितता म्हणून नगर जिल्हा सहकारी बॅंकेने केवळ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी 50 लाख रुपयांचा विमा घेतल्याची माहिती अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली.
कोविड-19 पासून कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी बॅंकेतर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सॅनिटायझर, मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तथापि, बॅंकेचे काम करताना कर्मचारी तणावमुक्त असायला हवेत, म्हणून त्यांच्यासाठी हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष गायकर यांनी सांगितले.
जिल्हा सहकारी बॅंकेच्या या निर्णयामुळे बॅंकेतील कोणत्याही कर्मचाऱ्याचा सेवाकाळात कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांची भरपाई मिळेल, अशी माहिती उपाध्यक्ष रामदास वाघ, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली. नगर जिल्हा सहकारी बॅंकेचा राज्यभर लौकिक आहे. त्यास साजेसे असेच निर्णय सध्या घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिलेले आहे, अशी माहिती ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.