कराड – गेले काही दिवसांपासून सातारा, सांगली, कोल्हापूरला महापूराने थैमान घातले असतानाही युतीचे सरकार विदर्भात जल्लोष करण्यात मग्न झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या संपूर्ण पूर परिस्थितीला युतीचे सरकारच जबाबदार असून याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी,
अशी मागणी राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.
शनिवारी कराड येथील पूरपरिस्थितीची पाहणी दौऱ्यावर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सुनील पाटील उपस्थित होते. थोरात म्हणाले, सन 2005-06 मध्येही अशी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यापेक्षाही भीषण पूरस्थिती यावेळी निर्माण झाली होती. असे असतानाही सरकारला याचे कसलेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत लोकांना मदतीची अपेक्षा असते. मात्र आपद्ग्रस्तांपर्यत मदत पोहवविण्यात हे सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. पूर ओसरु लागेल तशी रोगराई मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहेत. पूर परिस्थिती निर्माण होण्याअगोदर करावयाच्या उपाययोजना, आपत्तकालीन व्यवस्थांबाबत घ्यावयाची काळजी यामध्ये सरकार अपयशी ठरल्यानेच सर्वसामान्य लोकांना महापूरासारख्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात महापूराने थैमान घातले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रांचा आनंद घेत आहेत. जल्लोषात मग्न झालेल्या या सरकारला महापुरात अडकलेल्यांचा आक्रोश कसा ऐकायला येणार. या महापूरात जीव गमावल्याचा आकडा 140 च्या वर गेला आहे. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीकर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याशी पूर परिस्थिती निर्माण होण्याआधीच चर्चा करुन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सुचित करणे गरजेचे होते. मात्र जल्लोषात तल्लीन झालेल्या या सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीस सरकारच कारणीभूत आहे.
विदर्भात जल्लोष तर मातोश्रीवर पक्षप्रवेश
एकीकडे प. महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे विदर्भात संकल्प मेळावे, जल्लोष तर मातोश्रीवर पक्षप्रवेश सुरु होते. यावरुन या राज्यकर्त्यांना पूरग्रस्तांबाबत कितपत गांभीर्य आहे, हे दिसून येत आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील भागात पूरस्थिती निर्माण झालेली असतानाही चार दिवस फिरकत नाहीत. अशा मंडळींना मंत्रिमंडळातून हाकलून देवून त्यांचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.