आ. जयकुमार गोरे यांची घोषणा : येत्या काळात कॅबिनेट मंत्रीही असेन
सातारा – जिल्ह्याच्या राजकारणात काहीही ठरले असले तरी आपले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आगामी निवडणुकीत पॅनेल टाकायचे ठरले आहे, अशी घोषणा आ.जयकुमार गोरे यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्यासोबत जिल्ह्यात एका विचाराचे आणखी दोन आमदार निवडून येतील. त्याचबरोबर नूतन मंत्रिमंडळात मी राज्यमंत्री नव्हे तर कॅबिनेट मंत्री ही होईन, असेही आ. गोरे यांनी यावेळी सांगितले.
तसा सुभा कधी मांडलाच नाही
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघातून केवळ एकच जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, त्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये प्रत्येकाचा व्यक्तिगत सुभा होता. त्यामुळे त्यांना यश मिळाले. मी मात्र, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देवून ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी थेट नाळ जोडली गेली आहे. गेल्या काही वर्षात जवळचे नेते दूर गेले. मात्र, त्याचा उलट सकारात्मक परिणाम दिसत असून प्रत्येक गावात मतांची संख्या वाढत आहे. दहा वर्षात मतदारसंघात 90 टक्के रस्ते डांबरी करण्यामध्ये यश मिळाले.
त्याचबरोबर उरमोडीचे पाणी आल्यामुळे मुंबईला विस्थापित होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. येत्या काळात जिहे-कठापूरची योजना पूर्ण होताच मतदारसंघाच्या विकासाला हातभार लागणार आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसात औद्योगिक वसाहत निर्मितीची अधिसूचना निघणार असून परिणामी माण-खटावच्या युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे आ. गोरे यांनी सांगितले.
एकत्र येणे शक्यच नाही
दरम्यान, शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर आ.गोरे यांनी शुभेच्छा एवढाच शब्द उच्चारत स्मितहास्य केले. तर आगामी काळात ना.रामराजेंसोबत एकत्र काम करण्याचा योग असल्याच्या शक्यतेबाबत आ. गोरे म्हणाले, दोन वेगळ्या रक्त गटाची माणसे एकत्र राहू शकत नाहीत. त्यामुळे एकत्र काम करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असे त्यांनी सांगितले. ना. रामराजे ना.निंबाळकर यांना टोकाचा विरोध का, या प्रश्नावर आ.गोरे म्हणाले, ज्या व्यक्तीने माझ्या मतदारसंघाला पाण्यापासून वंचित ठेवले. पृथ्वीच्या अस्तापर्यंत पाणी मिळूच शकणार नाही, असे हिणवले. अशा व्यक्तीला नव्हे तर विचाराला आपला विरोध आहे व तो कायम राहणार, असे आ. गोरे यांनी स्पष्ट केले.
दै. प्रभात कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान आ. गोरे यांनी आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, यावेळी दै. प्रभातचे ब्युरो मॅनेजर जयंत काटे यांनी आ. गोरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मुख्य प्रतिनिधी संदीप राक्षे, सम्राट गायकवाड, प्रशांत जाधव, प्रशांत कुलकर्णी, संदीप राजे अविनाश कदम यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा बॅंक व जिल्हा परिषद यांचे महत्वाचे स्थान आहे. दोन्ही सत्तास्थानांची सुत्रे ज्यांच्याकडे राहिली त्यांच्या पाठीशी जिल्ह्यातील जनता राहिली आहे. जिल्हा बॅंकेची निवडणूक आता केवळ दहा महिन्यांवर आली असून त्या निवडणुकीत पॅनेल टाकणार, असे आ. गोरे यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप प्रवेशाच्या चर्चांवर वेट ऍण्ड वॉच, असे सांगून आ. गोरे म्हणाले, तूर्त जिल्ह्यातील समविचारी सहकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर माझ्यासोबत दोन सहकारी आमदार झालेले दिसून येतील व नूतन मंत्रिमंडळात मी कॅबिनेट मंत्री ही असेन, असा विश्वास आ.गोरे यांनी व्यक्त केला. माण-खटाव मतदारसंघात विरोधकांनी एकत्र येत आमचे ठरलंयचा नारा दिला आहे. त्यावर आ. गोरे म्हणाले, ज्यांचे ठरले आहे ते ठरविण्यासाठी माझ्याकडची दोन माणसे तिकडे पाठविली आहेत. वास्तविक ज्या व्यक्ती टिका करत आहेत.
ते मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत होते. त्यानंतर ते भाजपमध्ये आले मात्र, लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले. एवढेच काय तर पक्षाने पोलिंग बुथचे फॉर्म देखील त्यांना दिले नाहीत. ह्यावरून त्यांची विश्वासहर्ता स्पष्ट होते, असे आ. गोरे यांनी सांगितले. पूरपरिस्थितीवर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांना टिकेचे लक्ष्य केले. त्यावर आ. गोरे म्हणाले, संकटाच्या काळात आरोप टाळून मदतकार्याला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, त्याचबरोबर जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असताना पालकमंत्री कितव्या दिवशी जिल्ह्यात आले? याचे देखील आत्मपरिक्षण त्यांनी केले पाहिजे. सांगली जिल्ह्यात पूरस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी पडले का, या प्रश्नावर आ. गोरे म्हणाले, प्रत्येक आपत्तीत सरकारला दोष देता येणार नाही.
प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे काही प्रमाणात दिरंगाई झाली आहे. मात्र, अशा परिस्थितीत देखील स्व. पतंगराव कदम यांच्यानंतर आ. विश्वजीत कदम हे पाण्यात उतरून पूरग्रस्तांना मदत करीत आहेत, असे आ. गोरे यांनी सांगितले. ईव्हीएमला होत असलेल्या विरोधाबद्दल आ. गोरे म्हणाले, आजपर्यंतच्या माझ्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी धक्कादायक निकाल निश्चित लागले आहेत. परंतु पराभूत उमेदवारांनी देखील अपयशाचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे, असे मत आ. गोरे यांनी व्यक्त केले.