नगर (प्रतिनिधी) – जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, अर्ज माघारीसाठी अवघा दीड दिवस उरला आहे. आज दिवसभरात एकाही उमेदवाराने अर्ज माघारी न घेतल्याने जिल्ह्यातील नेत्यांची अस्वस्था वाढली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत तब्बल 312 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची छाननी होवून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात दोन जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरित 19 जागांसाठी 195 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सोमवारी (दि.8) पाथर्डी तालुक्यातील सेवा सोसायटी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे व जामखेड तालुक्यातील सेवा सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांच्या विरोधात असलेले अर्ज विरोधकांनी मागे घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र, आज एकही उमेदवाराने अर्ज माघारी न घेतल्याने जिल्ह्यातील नेत्यांची अस्वस्था वाढली आहे. अर्ज माघारीची मुदत अवघा दीड दिवस राहिल्याने बँकेच्या सत्तेसाठी चांगलीच रस्सीखेच होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 फेबु्रवारीला मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा, त्यानंतर अर्जांची छाननी करून त्यातून पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा टप्पा संपला आहे. आता 11 फेबु्रवारीपर्यंत माघारीसाठी वेळ असून, छाननीनंतर बँकेच्या निवडणुकीसाठी वेग येणार आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीमध्ये सोसायटी मतदारसंघातून 14 तालुक्यांतून 59 उमेदवार रिंगणात आहेत. यात अकोले 3, जामखेड 3, कर्जत 7, कोपरगाव 5, नगर 3, नेवासे 4, पारनेर 10, पाथर्डी 2, राहुरी 7, संगमनेर 5, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 4, यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून 7, भटक्या विमुक्त जमाती मतदारसंघातून 11, महिला रखीव जागांसाठी 28, ओबीसासाठी 33, बिगरशेती 29 आणि शेतीपूरक मतदारसंघातून 28, असे एकूण 195 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
त्यापैकी आज अखेर जिल्ह्यात चार जणांची बिविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामध्ये भाजपचे तीन, तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे आली आहे. त्यामुळे उर्वरित 17 जागांवर काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.