नगर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सतर्क असून, सहभागी यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज फेसबुक संवादाद्वारे दिली. तसेच नागरिकांच्या मनातील प्रश्नांना आणि शंकांना त्यांनी उत्तरे देत शंकांचे निरसन केले. त्यामुळे करोना विरुद्धच्या या लढाईत आता नागरिकही स्वत: च्या आरोग्याची काळजी घेत उतरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. ही माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत जावी. कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे एखाद्या यंत्रणेबद्दलची प्रतिमा तयार होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला.
अनेक नागरिकांनी फेसबुक संवादात सहभाग घेत त्यांच्या मनातील प्रश्न उपस्थित केले, यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या चाचण्यांची संख्या वाढत असल्याने रुग्ण संख्या वाढणार आहे. मात्र, यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. आपण रुगणांपर्यंत पोहोचून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेवढे रुग्ण वाढत आहेत, तेवढे किंबहून त्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत.
नागरिकांनी या आजाराची लक्षणे जाणवल्यास जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे,असेही त्यांनी सांगितले. ज्या रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, मात्र ते बाधित आहेत, त्यांनी थेट जिल्हा रुग्णालयात न येता अशा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले पाहिजे. जेणेकरुन गंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा वापरता येईल.
येत्या 2-3 दिवसात पोर्टल तयार करुन तालुकानिहाय सर्व हॉस्पिटलची माहिती, उपलब्ध बेडसंख्या देण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणांचे सबळीकरण, आरोग्य यंत्रणेतील समन्वय, खासगी आरोग्य यंत्रणांची याकामी मदत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आदीबाबत आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन अव्याहतपणे कार्यरत आहे.
तसेच खासगी रुग्णालयांना ठरवून दिलेले शुल्कच आकारावे असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात घेतलेले विविध निर्णय, रुग्णांची गैरसोय टळावी यासाठी तालुक्यातच कोविड केअर सेंटर सुरु केले आहे.
जिल्हाधिकारी असमाधानी…
सार्वजनिक ठिकाणी वावरताना अजूनही नागरिक नियम पाळताना दिसत नाहीत, याबाद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले. असे नागरिक इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचवत असल्याचे ते म्हणाले. आपण सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे या बाबी पाळल्या पाहिजेत. त्यामुळे होणारा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी आपण कमी करु शकू असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.