पाटण – प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही, त्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारा वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर,
सत्यजित पाटणकर आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, “”प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी, घरे दिल्यामुळे कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. या निर्मितीमध्ये कै. यशवंतराव चव्हाण व कै. बाळासाहेब देसाई यांचेही मोलाचे योगदान आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील.” अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील बाधित झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा लवकरात लवकर शोधण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून धरणाची निर्मिती झाली आहे.त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. कोयनानगर परिसरात पर्यटन वाढीसाठी विविध विकासकामे करण्यात येत आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौका विहार सुरु करण्याबाबत प्रयत्न आहे, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. यावेळी खा. पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, डॉ. भारत पाटणकर याची भाषणे झाली. प्रास्ताविक असिम गुप्ता यांनी केले.
कामाबद्दल नाराजी… आणि सज्जड दम
कोयनानगर येथील चेंबरी या नूतनीकृत विश्रामगृहाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते झाले. मात्र, बांधकामाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. “कशाचे उदघाटन केले, मला काय समजले नाही, चेंबरीचे काम अजिबात बरोबर झालेले नाही. अधिकारी लोक तुम्ही जरा काहीतरी बाळगा. डोईफोडे काय कोण? त्यांना काही कळेना. त्या कामाचे इस्टिमेंट मी मागणार आहे. निधीचा कमतरता आम्ही करत नाही मग कामं का होत नाहीत, चुकीच्या कामाचा जाब विचायला नको का, जनतेचा पैसा कराचा पैसा जनतेसाठी योग्य वापरा,’असा सज्जड दमच अजित पवार यानी कोयना सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला.