पुणे – सुदीक्षा फाउंडेशन व तेजोवलय परिवार पुणेतर्फे शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मुळशी जवळील अंबडवेट येथील राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेत शंभर गरजू कातकरी महिलांना गृहपयोगी भांडे वाटप करण्यात आले. उद्योजिका अनिता अग्रवाल कुटुंबीयाने ही भांडी उपलब्ध करून दिली होती.
आंबटवेट येथील समन्वयक प्रदीप पाटील यांनी आरंभी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महिलांना भांडी वाटप करण्यात आले. यावेळी कातकरी महिलांनी पारंपरिक लोकगीते व देवीची गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. या प्रसंगी संदीप क्षीरसागर, प्रशांत चितळे, सागर चव्हाण, महेश हल्लाळे, छगन माने, सुमन गोपाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सुदीक्षा फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा उमा गोपाळे विश्वनाथन यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप साळुंके आणि श्यामला जोशी यांनी शिक्षण व आरोग्य व व्यसनमुक्ती याविषयी जागृती निर्माण झाली पाहिजे, असे सांगून कातकरी समाजबांधवांच्या समस्येकडे गांभीर्याने सर्वांनी लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले. राजेंद्र वाघ यांनी निर्भय कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गहेरवार यांनी केले. सूत्रसंचालन सचिन आखरे यांनी केले. आभार ज्योती देशकर यांनी मानले. अनिता अग्रवाल कुटुंबीयांचे सुदीक्षा फाउंडेशन व तेजोवलय परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.