वाघोली : वाघोली येथील गायरान क्षेत्राच्या अतिक्रमण धारकांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद झाली असून त्यांना वाघेश्वर नगर येथे ग्रामपंचायत ८ अ चे उतारे वाटप करण्यात आले. यामुळे अतिक्रमण धारकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
अतिक्रमणधारकांना हक्काचे घर मिळावे, अतिक्रमणाच्या नोंदी व्हाव्यात यासाठी अतिक्रमणधारक, संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होते. वेळप्रसंगी आंदोलने देखील झाली. वाघोलीचा समावेश पुणे महापालिकेत होणार असल्याने अतिक्रमण धारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मासिक सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार २०११ पूर्वीच्या अतिक्रमण धारकांची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करण्यात आली.
नोंद झाल्यानंतर बहुतांश अतिक्रमण धारकांनी टॅक्सदेखील भरला आहे. त्यानुसार अतिक्रमण धारकांना ८ अ उताऱ्याचे वाटप वाघेश्वर नगर येथे करण्यात आले. ग्रामपंचायत ८ अ चा उतारा मिळाला असल्याने अतिक्रमण धारकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, उपसरपंच महेंद्र भाडळे, ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे, रोहिणी गोरे, सुधीर भाडळे, समीर भाडळे, सागर गोरे, सुनील जाधवराव, बाळासाहेब सातव, संदीप थोरात यांच्यासह गायरान क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.