कराड (प्रतिनिधी) -सातारा जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांची कोव्हिड 19 चाचणी मोफत करावी, दुकानदारांना 50 लाखाचे शासनाकडून विमा संरक्षण मिळावे आदींसह विविध उपाययोजना रास्तभाव (रेशनिंग वितरण) दुकानदार व किरकोळ केरोसिन विक्रेता संघटनेने प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे निवदेनाद्वारे केल्या आहेत. राज्य संघटनेच्या आदेशानुसार एक जूनपासून धान्यवाटप बंद करण्यात येणार असल्याचेही निवदेनात नमूद केले आहे.
जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांच्यासह धान्य दुकानदारांनी प्रांताधिकारी दिघे यांची भेट घेवून कैफियत मांडली. यावेळी त्यांनी सूचवलेल्या उपाययोजनांचे निवेदनही दिले.
करोनाची मोफत चाचणी करण्यासह दुकानदारांना 50 लाखाचे शासनाकडून विमा संरक्षण, दुकानदारांना एन 95 मास्क, फेस कव्हर, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर आदीच्या शासनाने सुविधा द्याव्यात. अनेक एपीएलचे कार्डधारक मोफत तांदूळ देत नसल्याने दुकानदारांशी वादावादी करत आहेत. त्यासाठी दुकानास पोलीस किंवा होमगार्ड यांची नेमणूक करावी, कोव्हिड 19 काळात अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, पुढारी रास्तभाव दुकानांवर दबाव आणून त्यांना वाटपासाठी आलेल्या धान्याची मागणी करत आहेत. दुकानदारांनी धान्य न दिल्यास कार्यकर्त्यांना हाताशी धरून तक्रारी अर्ज केले जात आहेत. त्यामुळे दुकानदारांचे मनोधैर्य खचले आहे. संबंधितांचा बंदोबस्त करावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
ग्रामीण भागातील दुकानदारांकडे सुमारे चारशे तर शहरी भागात सुमारे 600 कार्डधारक धान्य नेण्यासाठी येतात. दुकानातील कामे तीन पटीने वाढली आहेत. त्यात ग्रामीण भागाती बाधित रूग्ण आढळत आहेत. शासनाने बाहेरून प्रवास करून येणाऱ्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहक नेमका कोठून आला, हे दुकानदाराला समजत नाही. परिणामी दुकानदारांना करोनाचा धोका जास्त आहे. करोनापासून बचावासाठी संघटना उपाययोजना सूचवत असून त्याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.