पुणे – सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील काही भागांमध्ये ओढवलेल्या पूरस्थितीने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांची घरे पाण्याखाली गेली तर काहींना जीव गमवावे लागले. अशा परिस्थितीत बेघर झालेल्या बांधवांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न “दै. प्रभात’ आणि श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेने केला आहे. संयुक्त विद्यमाने या दोन्ही संस्थांनी पुण्यातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने स्थानिकांसाठी विविध जीवनावश्यक गोष्टींचे संकलन करून गावात जाऊन त्याचे वाटप केले.
पाण्याची पातळी वाढल्याने कोल्हापूर आणि सांगलीचा परिसरांतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. काहींचे संसार पाण्यासोबत वाहून गेले. दुर्गम गावांमध्ये मदत पोहोचणे देखील अवघड झाले होते. अशावेळी स्थानिकांना जीवनावश्यक गोष्टींची गरज होती. यासाठी “दै. प्रभात’ आणि श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेतला आणि त्यांनी जीवनावश्यक गोष्टींचा समावेश असलेली 2 ट्रक मदत बोरगाव येथे पोहोचवली.
संकलित झालेल्या वस्तूंच्या माध्यमातून कुटुंबाला एक महिना पुरणाऱ्या वस्तूंचे किट तयार करण्यात आले होते. नागरिकांना सुमारे 500 पेक्षा अधिक किट देण्यात आले. या किटमध्ये आटा, डाळ, पोहे, तेल, तांदूळ, मसाले, मेणबत्ती, साबण, कडधान्ये, साखर, ओआरएस पावडर, गुडदाणी, फिनाईल आदी वस्तूंचा समावेश होता. यासह 200 पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स, कपडे, बिस्कीट बॉक्स, तेलाचे डबे, अंथरुण, पांघरुण, सॅनिटरी नॅपकीन्स हे देखील बोरगाव येथे पाठवण्यात आले आहे.
दै. “प्रभात’ आणि श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेसह राधाकृष्ण युवक मंडळ, महेश सेवा संघ, जुगलकिशोर पुंगलिया, संतोषजी चोपडा, सोमनाथ वाघमारे, जेठमलजी गांधी, पूनमचंदजी धूत, नवलजी भुतडा, संतोषजी जाजू, नवनीथजी मुथा आदींनी विशेष सहकार्य केले. यासह राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड एम्प्लोयी यांच्यामार्फत दहा हजार रुपयांची रोख रकमेची मदत करण्यात आली.
यासंदर्भात श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक उमेश वाघे म्हणाले, दि. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी मदतीचे संकलन केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत सढळ हाताने मदत केली
होती.
बोरगाव येथे प्रत्यक्ष जाऊन खरोखर पुराने बाधित असणाऱ्या कुटुंबांना ही मदत करण्यात आली. नुकताच पूर ओसरला होता आणि घराची साफसफाई करणाऱ्या पूरग्रस्तांनी वेळेवर मदत मिळाल्याची भावना व्यक्त केली. मदत योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेत पोहोचल्याचे समाधान आहे.