अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई:- राज्यातील 52 हजार 429 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 9 जुलै पर्यंत राज्यातील 40 लाख 50 हजार 32 शिधापत्रिका धारकांना 5 लाख 81 हजार 780 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 429 स्वस्तधान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 3 लाख 26 हजार 689 क्विंटल गहू, 2 लाख 55 हजार 93 क्विंटल तांदूळ, तर 3 हजार 321 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 91 हजार 951 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 6 जूनपासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण 1 कोटी 36 लाख 89 हजार 891 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 6 कोटी 7 लाख 9 हजार 250 लोकसंख्येला 30 लाख 99 हजार 160 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.
राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे मे व जून महिन्यासाठी आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 54 हजार 763 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.
आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या 2 महिन्यांसाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे आतापर्यंत 1 लाख 28 हजार 751 क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे.
राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.