नवी दिल्ली : करोना परिस्थितीवरून विरोधक सतत केंद्रावर निशाणा साधत आहेत. विरोधकांनी मोदींनी विदेशात लसी पाठवल्यामुळे देशात तुटवडा जाणवत असल्याचा आरोप केला . भारतात गेल्या काही दिवसांत करोनाच्या रोजच्या घटनेत घट झाली आहे, परंतु मृत्यूची संख्या कमी होत नाही. त्यातच लसीचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी म्हणाले, “देशात लसीकरण कमी होत आहे आणि करोनामुळे मृत्यू वाढत आहेत. लक्ष भटकवणे, खोट्या गोष्टी पसरवणे आणि तथ्य लपवणे हीच केंद्र सरकारची निती आहे.”
वैक्सीन कम होती जा रही हैं और कोविड मृत्यु बढ़ती जा रही हैं।
केंद्र सरकार की नीति-
ध्यान भटकाओ,
झूठ फैलाओ,
शोर मचाकर तथ्य छुपाओ। pic.twitter.com/aIJwvMYBTW— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 19, 2021
दरम्यान, मंगळवारी देखील त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. तसेच या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुलांना करोनापासून वाचविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
“येणाऱ्या काळात मुलांना करोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे”, असे राहुल गांधी म्हणाले होते.