वाई (प्रतिनिधी) – आमची जिल्हा परिषदेची शाळा मारुतीच्या देवळात भरायची. शिक्षक मात्र करारी, मेहनती असल्यानेच जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी जिल्हाधिकारी, आयुक्त, तीन वेळा खासदार आणि राज्यपाल झाला, असे उद्गार खा. श्रीनिवास पाटील यांनी भिलारवाडीतील (वेळे) बाल आंनद मेळाव्यात काढले.
पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, सदस्य मधुकर भोसले, नीलेश डेरे, माजी उपसभापती अनिल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत पवार, गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, केंद्रप्रमुख विलास पोळ, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. खा. पाटील म्हणाले, प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मनावर घेतले तर खेड्यातल्या विद्यार्थी राज्यपालसुद्धा होऊ शकतो, याचे मी स्वत: उदाहरण आहे.
शिक्षकाने विद्यार्थ्यांवर पोटच्या पोरांसारखं प्रेम करावं, आकार द्यावा. पगार वाढतो तसे शिक्षणातील योगदानसुद्धा वाढले पाहिजे. ही बाल आनंद मेळाव्याची संकल्पना मला आवडली. शाळेत संगीत शिक्षण शिक्षण द्या. इंग्रजी, उर्दू, हिंदी, मराठी अशा अनेक भाषा शिकलेले विद्यार्थी घडवा. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले.