उन्नाव, दि. 13 – करोना संक्रमण काळात आरोग्य विभागाची व्यवस्था आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत उत्तर प्रदेशातील उन्नावच्या डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा सादर केला आहे. हे डॉक्टर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राचे प्रभारी आहेत.
जिल्ह्यात कोविड संक्रमण वाढीसाठी आपल्याला बळीचे बकरे बनवले जात असल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला आहे. या डॉक्टरांनी जिल्हा दंडाधिकारी आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर छळाचा आणि हुकूमशाहीचा आरोप केला आहे. हा वाद सोडवण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले आहे. करोनाने धुमाकूळ घातलेला असतानाच उन्नाव जिल्ह्यातील सामुदायिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांच्या प्रभारींनी आपला राजीनामा अपर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे.
औषधे आणि इतर उपचाराच्या साधनांच्या कमतरतेचा आपल्याला सामना करावा लागतोय. परंतु त्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र कुमार व मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचे आशुतोष सिंग यांची उपेक्षा सहन करावी लागतेय. असा छळ आम्ही सहन करणार नाही, असं म्हणत डॉक्टरांनी राजीनामे सोपवले आहेत.