पाण्यासाठी दहा महिन्यांचे आश्वासन
पिंपरी – शहर आणि उपनगरांमधील अनियमित घरे, शास्ती कर, सोसायट्यांच्या पाण्यासाठी होत असलेली वणवण, विकासकामांच्या नावाखाली खड्ड्यात गेलेले रस्ते आणि धुळीने माखलेला परिसर असे कित्येक “प्रलंबित प्रश्न’ सत्ताधाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहेत. समस्या कायम ठेऊन आश्वासनाची पाने तोंडाला पुसण्याचे धोरण यावेळी मात्र सत्ताधाऱ्यांना चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. शहरात पहिल्यांदाच नागरिक थेट विरोध नोंदवू लागले आहेत. सोसायट्यांबाहेर लागलेले “नो वॉटर, नो वोट’चे होर्डिंग, भरसभेमध्ये आपल्या घरांसाठी आक्रोश व्यक्त करणारे नागरिक, अशी दृश्ये सत्ताधाऱ्यांचा अति आत्मविश्वास विचलित करण्यासाठी पुरेसे ठरणारे आहे.
शहरातील सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक ऐन पावसाळ्यात सुद्धा पाणी टंचाईने त्रासले आहेत. पिंपळे सौदागर, वाकडसारख्या उच्चभ्रू परिसरात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे धरण ऑक्टोंबरच्या मध्यालाही तुडुंब भरलेले असताना अपुरा पाणीपुरवठा, पाणी कपात लादण्यात आली आहे. पुढील जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी दिले जात नाही. यामुळे त्रस्त झालेल्या सोसायटीधारकांनी “नो वॉटर, नो वोट’ मोहीम सुरू केली. हाच प्रश्न घेऊन पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे पदाधिकारी थेट मुख्यमंत्र्याकडे गेले होते.
मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुढील दहा महिन्यात हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील सोसायट्यांना सध्या पाणी प्रश्नाने घेरले आहे. त्याबाबत वारंवार निवेदने देऊन, आंदोलन करून देखील हा प्रश्न सुटलेला नाही. हा प्रश्न न सुटल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सोसायटीधारकांनी दिला होता. वाकड येथील अटलांटा हाऊसिंग सोसायटीने “नो वॉटर, नो वोट’ मोहीम सुरू केली होती. त्यांनी सोसायटीच्या बाहेर त्याचा फलकच लावला होता. सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष राजे यांनी देखील पाणी प्रश्न न सुटल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस पिंपरी-चिंचवड येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्या वेळी त्यांची फेडरेशनच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तसेच, त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आमदार लक्ष्मण जगताप, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, फेडरेशनचे अध्यक्ष राजे यांच्यासह सरचिटणीस के.सी.गर्ग, सचिन लोंढे आदी उपस्थित होते.
सोसायट्यांचा पाणी प्रश्न काय ?
शहरात एकूण 3 हजार 869 सोसायट्या आहेत. त्यातील मोठ्या सोसायट्या या सुमारे 300 आहेत. मोठ्या सोसायट्यांना उन्हाळ्यात दिवसाला सुमारे 30 टॅंकर इतके पाणी लागते. तर, उर्वरित आठ महिन्यांमध्ये मात्र हे प्रमाण निम्म्यावर म्हणजे 15 टॅंकर दररोज इतके असते. छोट्या सोसायट्यांना तुलनेत दररोज तीन ते चार टॅंकर अतिरिक्त पाणी मागवावे लागते. महापालिका देत असलेले पाणी अपुरे पडत असल्याने मुख्यत्वे हा प्रश्न निर्माण झाला आहे.