लाहोर – आयपीएल स्पर्धेच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने ही स्पर्धा होणार याची निश्चिती झाली. मात्र, त्यामुळे बीसीसीआयचे जागतिक क्रिकेटवरचे वर्चस्व सिद्ध झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये पोटशूळ उठला आहे.
सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असलेल्या माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शोएब अख्तरने नैराश्यातून टीका केली आहे. आयपीएल झालीच पाहिजे मग त्यासाठी टी-20 विश्वकरंडक खड्ड्यात गेला तरी चालेल असेच धोरण सध्या आयसीसी, बीसीसीआयसह त्यांना समर्थन देत असलेल्या सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांचे दिसत आहे, अशा शब्दांत शोएबने आपला संताप व्यक्त केला.
ही स्पर्धा अमिरातीत होणार असून त्यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ, श्रीलंका क्रिकेट मंडळ व आयसीसी यांच्यावर प्रचंड दबाव टाकला. बीसीसीआय आज जागतिक क्रिकेटमधील सर्वांत श्रीमंत संघटना असल्याने या देशांनी त्यांच्या दबावासमोर मान तुकवली व अखेर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला.
त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळालाही दबावासमोर झुकून आशिया करंडक व पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने रद्द करावे लागले. त्यामुळे शोएबसह पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंनी तसेच पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही बीसीसीआय व आयसीसी यांच्यावर टीका सुरू केली आहे.
टी-20 विश्वकरंडक रद्द झाला तरी चालेल मात्र, आयपीएल स्पर्धा व्हायलाच पाहिजे. अशा स्पर्धांमध्ये खेळून खेळाडू करोडपती होतात पण त्यामुळे क्रिकेटचा दर्जा खालावतो, अशा शब्दांत शोएबने आपला संताप व्यक्त केला आहे.
खरी मळमळ कशासाठी?
आयपीएलच्या पहिल्या काही मोसमानंतर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना या स्पर्धेत एकाही संघाने स्थान दिले नाही. भारत व पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावाचे पडसाद या स्पर्धेतही उमटले व तेव्हापासून पाकच्या खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद झाले. त्यामुळेच या स्पर्धेबाबत सातत्याने पाक खेळाडू टीकेचा सूर लावतात. मात्र, आपल्या खेळाडूंना त्यात खेळण्याची संधी मिळत नाही यासाठीच ही मळमळ ते सातत्याने बोलून दाखवतात.