“वायसीएम’मध्ये उपचार मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील रुग्णांसाठी वरदान ठरलेले महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय कोविड रुग्णांसाठी आरक्षित केल्यामुळे या ठिकाणी होणारे इतर आजारांवरील उपचार बंद झाले आहेत. त्यामुळे शहरातील इतर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना कोठेच योग्य पद्धतीने उपचार मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून महापालिकेने इतर आजारांसाठी परिपूर्ण असलेले एखादे रुग्णालय तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
महापालिकेचे यशवंतराव चव्हाण हे जिल्ह्यातील प्रतिथयश आणि सर्वसामान्यांसाठी वरदान ठरलेले रुग्णालय आहे. या ठिकाणी सर्वच आजारांवर उपचार अल्प अथवा मोफत स्वरुपात मिळत असल्यामुळे सुमारे सहाशे ते हजार रुग्णांवर रोज या ठिकाणी उपचार केले जात होते. मोठ-मोठ्या शस्त्रक्रियाही अगदी अल्पदरात होत असल्यामुळे सर्वसामान्य, गरीब, मजूर रुग्ण हे वायसीएमवर निर्भर होते. मात्र मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर हे रुग्णालय केवळ करोनाच्या रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वायसीएम रुग्णालय आरक्षित करत असताना महापालिकेने इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र केवळ डी. वाय. पाटील रुग्णालयावर संपूर्ण बोजा टाकून हात झटकले आहेत. या रुग्णालयात योग्य पद्धतीने उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर इतर ज्या रुग्णांलयाची नावे पालिका जाहीर करत आहे त्या ठिकाणी रुग्णांना ऍडमिटच करून घेतले जात नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या गोरगरीब नागरिकांची हेळसांड सुरू झाली आहे.
महापालिकेची चार रुग्णालये सध्या बांधून उभी आहेत. मात्र ती सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे केवळ वैद्यकीयच्या नावाखाली खरेदी करून आपल्या तुंबड्या भरण्यापलीकडे काहीच सुरू नसल्यामुळे नगरसेवकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. नविन भोसरी अथवा जिजामाता रुग्णालयात सर्वोपचार सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची सोय होऊ शकते मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
साथीच्या आजारांची भीती
सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे साथीच्या आजार पसरण्याची भीती आहे. महापालिकेचे वायसीएम रुग्णालय राखीव असल्यामुळे साथीच्या आजारातील उपचारासाठी नागरिकांनी जायचे तरी कोठे? असा प्रश्न निर्माण झाला झाला आहे. साथीच्या आजारांची तीव्रता वाढण्यापूर्वीच एखादे रुग्णालय तात्काळ गोरगरिबांसाठी पूर्ण सुविधायुक्त सुरू होणे गरजेचे आहे.
रुग्णांना पळविण्यासाठी करोनाची भीती
जे रुग्ण इतर दुर्धर आजारांनी त्रस्त आहेत, खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची ज्यांची आर्थिक क्षमता नाही, असे रुग्ण महापालिकेने उपलब्ध केलेल्या रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र आमच्याकडे खाटा शिल्लक नाहीत, अनेकांना या ठिकाणी करोना झाला आहे. आपण ऍडमिट होण्याचा अथवा उपचार घेण्याचा आग्रह धरल्यास आपणाला करोना वॉर्डात रहावे लागेल, अशी भीती दाखवून या रुग्णांना घरी पाठविले जात असल्याचा अनुभव अनेकांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.