नगर -बोल्हेगाव उपनगरात नागरी सुविधांचा बट्टयाबोळ झालेला असून, या भागातील पोलीस कॉलनीत नागरी सुविधांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष व त्यातून नागरीकांचा होणाऱ्या त्रासाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांतर्फे येथे आज आक्रोश आंदोलन करण्यात आले.
महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी टक्केवारीत अडकले असल्याचा आरोप करत त्यांच्या नावाने येथील उघड्या गटारीत टक्केवारीचे दगड टाकण्याचे अभिनव आंदोलन स्थानिक नागरीक व संघटनांच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले. महापालिका प्रशासनाचा यावेळी निषेधही करण्यात आला.
भारतीय जनसंसद, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने या आंदोलनाचा आयोजन करण्यात आले होते. ऍड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, दादासाहेब नेटके, शीतल जाधव, प्रतीक्षा नेटके, पूनम चव्हाण, वर्षा चव्हाण, मंदाकिनी कांबळे, आशा नेटके, संतोष जाधव, वसंत जाधव, सौज्ञावती राजगुरु, उदयसिंग वाणी, अनिकेत चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरीक आंदोलनात सहभागी झाले होते.
करवसुलीला प्राधान्य देऊन महापालिकेत टक्केवारी व टोलवाटोलवीत लोकप्रतिनिधी व अधिकारी मग्न असल्याचा आरोप करुन आंदोलनकर्त्यांनी उघड्या गटारीत टक्केवारीचा दगड व टोलवाटोलवीची प्रतिकात्मक वीट विसर्जित केली. शहर हद्दीत बोल्हेगावचा समावेश झाल्यानंतर महापालिकेने या उपनगराकडे अजुनही दुर्लक्षच केल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला.
पोलिसांच्या कुटुंबातील महिलांची पाण्यासाठी दररोज होते भटकंती..!
पंधरा वर्षापूर्वी बोल्हेगावला पोलीस वसाहत उभारण्यात आली. ठेकेदाराने कर्ज मंजूर करुन घरकुल लाभार्थींचे घेतले. लाभार्थींच्या बॅंक खात्यातून अजूनही पैसे कापले जात आहेत. अनेक वर्षापासून येथे पाणी, रस्ते व ड्रेनेजलाईनची समस्या कायम आहे. या भागात पोलीस मोठ्या संख्येने राहतात.
त्यांच्या कुटुंबातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ड्रेनेजलाईन नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने लक्ष्य पुरवावे अशी मागणी करण्यात आली.