विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक दाखवून योजनांचा घेतला जातो लाभ
पुणे – शालेय योजना राबवित असताना बऱ्याचदा विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक दाखवून त्याचा लाभ घेतला जातो. आता या “भानगडी’ रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करून घेण्यासाठी राज्य शासनाने खास नियोजन केले आहे. त्यांतर्गत इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण पूर्ण करण्यासाठी येत्या 31 मार्चपर्यंतची मुदत असणार आहे.
शालेय पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान, मोफत गणवेश वाटप, मोफत पाठ्यपुस्तक वाटप आदी योजना राबविण्यात येतात. याचा लाभ मिळवून देण्यासाठी व लाभाचे दुबार प्रदान रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक विभागाच्या सरल प्रणालीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार आधार नोंदणी केल्याचेही उघड झाले आहे.
काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठीच सर्व मुलांचे आधार क्रमांक नोंदवून त्याची खात्री करण्यात येणार आहे.
आधार कार्ड नसलेची नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार कार्ड असलेल्या परंतु चालू शैक्षणिक वर्षांमध्ये वयाची 5 व 15 वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा आधार नोंदणीमध्ये बायोमेट्रिक अपेडटद्वारे अद्ययावत करण्याचीही गरज आहे.
आधारकार्डवरील नाव, जन्म तारीख, लिंग व पत्त्यामध्ये बदल करावयाचा असल्यास विद्यार्थ्यांची डेमोग्राफीक अपडेटद्वारे दुरुस्ती करणे आवश्यक आहे. आता ही कामे शिक्षण विभागामार्फतच होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिली.
आधार नोंदणीसाठी 816 संच उपलब्ध
करोना पार्श्वभूमीवर सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम होणार आहे. शाळा सुरू होईपर्यंत तहसील कार्यालय, बॅंक, पोस्ट ऑफिस या पर्यायी व्यवस्थेचा वापर होणार आहे. आधार नोंदणीसाठी एकूण 816 संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक गटसाधन केंद्रामध्ये म्हणजेच प्रत्येक पंचायत समितीत दोन याप्रमाणे आधार नोंदणी केंद्र कार्यान्वित होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील दोन आधार नोंदणी केंद्र ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.
1,10, 315 एकूण शाळा
2,25,60,578 विद्यार्थी संख्या
64,59,388 आधार नोंदणी नसलेले