मुंबई – महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्या वर्षी विविध खेळात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी केली आहे. या खेळाडूंना रोख रकमेची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली होती. मात्र या घोषणेला सहा महिने उलटून गेले तरी विजेत्या खेळाडूंना ना घोषीत करण्यात आलेली रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव करण्यात आला.
राज्य सरकार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची अवहेलना करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच या विजेत्या खेळाडूंना घोषित केलेली रक्कम तसेच त्यांचा उचित गौरव करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली.
पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी गेल्या वर्षी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात विविध खेळाडूंनी 286 पदकांची लयलूट केली आहे. तसेच या वर्षीच्या खेलो इंडिया स्पर्धेत सुध्दा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशात सर्वाधिक पदके पटकावली आहेत.
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनात वाढ करण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करणार
गेल्या वर्षभरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर चकमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र त्यांच्या तोंडाला सरकारकडून पाने पुसण्याचे काम होत आहे. त्यामुळे त्यांचा उचित गौरव बक्षिसाची रक्कम लवकरात लवकर मिळावी, अन्यथा याबाबत अंदोलन करण्यात येईल असेही पवार यांनी यावेळी सांगितले.