सातारा -राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालवधीत महाराष्ट्रात राबविण्यात येणार असून त्यात सातारा जिल्ह्याचे काम उठावदार होण्यासाठी आपले सरकार, नागरी सेवा व इतर वेबपोर्टलवरीत 10 सप्टेंबरपर्यंतच्या नागरिकांच्या अर्जांचा जास्तीत जास्त निपटारा करुन पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा शुभारंभ श्री. देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आला. यावेळी श्री. देसाई बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, “शासन हे सर्वसामान्याचे आहे. शासन गतीने काम करीत आहे. सहाशेच्या आसपास लोककल्याणकारी शासन निर्णय काढले आहेत. शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्य सचिवांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत.’ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा रोज किती अर्जांचा निपटारा झाला याचा जिल्हास्तरावर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा व तालुकास्तरावर प्रांताधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
या पंधरवड्यात जास्तीत जास्त अर्जांचा निपटारा होण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा व त्यानुसार काम करा. आपण लोकांचे सेवक आहोत या भावनेतून जास्त वेळ काम करावे लागले तर तेही करा. अर्जांवर जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर निर्णय घ्यायचा आहे त्या अर्जांवर तात्काळ निर्णय घ्या, असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाकडून काही मदत लागली तर तीही केली जाईल, अशी ग्वाही देऊन राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा जिल्ह्यात यशस्वी राबवावा, असेही श्री. देसाई यांनी सांगितले. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी आभार मानले.