नुकसानीचे पंचनामे करा : पालकमंत्री
जीवितहानी झालेल्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत
कराड – दत्त चौक व पाटण कॉलनीत पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र, माजी मुख्यमत्र्यांच्या कार्यपद्धतीमुळे हे काम बंद पडले आहे. आता या संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्यासाठी या कामाचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. त्यांना तांत्रिक मान्यता देऊन तात्काळ काम सुरु केले जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
पालकमंत्री शिवतारे यांनी गुरुवारी कराड येथील दत्त चौक, पाटण कॉलनीतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रातांधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, “”पूर परिस्थितीमुळे नुकसानीचे पंचनामे करुन पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल, तसेच जीवितहानी झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कराड व पाटण पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी “एनडीआरएफ’ची टीम कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत शासन वेळोवेळी संपर्क साधत आहे. अलमट्टी धरण व्यवस्थापकांकडून तीन लाख 60 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर आज कोयना धरणातून 67 हजार क्यूससेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.” शासनाचे पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे त्यांनी योवळी सांगितले.
पावसाळा संपताच छोटया-छोटया धरणांचे ऑडिट करण्यात येणार आहे. पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरणार नाही, यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व ती काळजी घेण्यात आली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना शासन नियमानुसार योग्य ती मदत दिली जाणार असून पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करुन मदत दिली जाणार आहे, अशी हमी त्यांनी दिली. आपत्ती काळात जिल्हा प्रशासनाने तप्तरतेने काम केल्याबद्दल शिवतारे यांनी समाधान व्यक्त केले.