रवींद्र कदम
प्रभारी पाटलांना अपयश आल्याची चर्चा : नगरला खमक्या अधिकाऱ्याची प्रतीक्षा
नगर –तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याने त्यांना 7 डिसेंबर रोजी पोलीस प्रशासनाकडून निरोप देण्यात आला. व पोलीस अधीक्षक पदाचा प्रभारी पदभार अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे सोपविला खरा मात्र, सिंधूंची पाठ फिरताच जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु झाला असून, प्रभारी पाटलांना अवैध धंद्येचालकांच्या मुसक्या आवळण्यात अपयशच आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नगरला खमक्या अधिकाऱ्याची प्रतीक्षा असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी 1 मार्च 2018 रोजी जिल्ह्यात पदभार स्वीकारला होता. जिल्ह्यात 9 महिने यशस्वी कार्यकाळ सांभाळून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. विविध सण उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवून शांतता ठेवली, गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण करून जिल्ह्यातील अवैध धंद्यावाल्यांसह पोलीस प्रशासनात कायद्याचा धाक निर्माण केला होता. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अनेक धाडसी कारवाई केल्या.
मात्र, नगर शहरासह जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, मोबाइल यांच्या चोरीबरोबरच घरफोड्या, धूम स्टाईलने सोने पळविण्याच्या घटनेत वाढ होत आहे. चोऱ्यांचे वाढते प्रमाण स्थानिक पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. वरिष्ठांचा वचक नसल्यानेच हे घडत असल्याची चर्चा शहरासह जिल्ह्यात असून, याचा फायदा उठवत अवैध धंद्यांसह चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे.
शहरात नगर तालुका पोलीस ठाणे, कोतवाली, एमआयडीसी, तोफखाना पोलिसांचे दुर्लक्ष झाले असून खाकीतील कर्मचारी अवैध धंद्याना पाठबळ देत असल्याचे दिसत आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे कलेक्टर पुन्हा सुरु झाले असल्याने जिल्ह्यात अवैध धंद्याना उत आला आहे. मुख्यतः शहरातील बाजार परिसरातील भर रस्त्यात व लहान लहान गल्लीबोळात सर्रासपणे मटका आकड्याचे दुकाने थाटली जात आहे.
तसेच घरफोडी, चैनस्नॅचिंग, रस्त्यात अडवून लुटमार करणाऱ्यांचे प्रमाण ही वाढले आहे. तसेच कोपरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट असून पोलीसांपुढे यामुळे नवे आव्हान उभे राहिले आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी जिल्ह्यासह शहरात मोकाट सुटलेले अवैध धंद्यावाल्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.