शशिकांत भालेकर
पारनेर – पारनेर तालुकातील पोलिसांचे सध्या चाललय काय? असा सवाल सर्वसामान्यांकडून केला जात आहे. अनेक घटनांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गेल्या दोन महिन्यांत दोन पोलीस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांशी सलगी प्रकरणावरून मुख्यालयात सक्तीने बदली. त्यामुळे पोलिसांचा धाकच कमी झाला असून त्यामुळे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत.
पारनेर तालुक्यामध्ये पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस निरीक्षक पद रिक्त असून प्रभारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे काम पाहत आहेत. त्यांची कार्यपद्धत चांगली असली तरी तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने त्यांच्यावर अधिक भार पडत आहे. सुपा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे असून त्याठिकाणी स्वतंत्र पोलीस निरीक्षक आहे, मात्र या ठिकाणी देखील औद्योगिक वसाहत असल्याने तेथे अनेक अवैध व्यवसाय, परप्रांतीयांचा लोंढा मोठ्या प्रमाणात येत असल्याने चोऱ्या व इतर गुन्हेगारीत वाढ होत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचा धाक तालुक्याच्या गुन्हेगारांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर राहिला आहे का? असा सवाल उपस्थित होतो. तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे गोळी घालून एका महिलेचा खून होतो. अनेक अवैध व्यवसाय सध्या जोरात सुरू आहेत. हॉटेल व्यवसायिक विनापरवाना दारू विक्री करताना दिसून येत आहे, मात्र पोलीस हातावर हात घेऊन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
चोरटी वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. गुटखा, मावा बंदी असताना तालुक्यात सर्रास विक्रीचे प्रमाण वाढत आहे. वाळू माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. तहसीलदारांवर देखील त्यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारची दहशत सध्या होताना दिसत आहे. मात्र, पोलीस अधिकारी गप्प आहे. ज्या खात्याचा वचक गुन्हेगारांवर पाहिजे. त्या खात्याचा वचक सर्वसामान्यांवर निर्माण होताना दिसत आहे. अनेक वेळा पोलीस गुन्हेगारांची सलगीचा प्रकार होतो. पारनेर पोलीस ठाण्याचा सुशोभिकरणाचा मुद्दा देखील न्यायालयात आहे.
अनेक सामाजिक संघटनांनी याविरोधात न्यायालयात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. पारनेर सारखे पुरोगामी विचाराच्या तालुक्यामध्ये निष्कलंक खमक्या नियमित अधिकाऱ्यांची गरज आहे, असा अधिकारी पोलीस ठाण्याला मिळावा अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे. बिंगो व मटक्याचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. तालुक्यात दिवसेंदिवस खून, मारामारी, गावठी कट्टे विक्री करणे, अवैध व्यवसाय आधी घटना वाढत आहे. पोलीस प्रशासन याला खतपाणी घालत असल्याचे नागरिक उघडपणे बोलताना दिसत आहे. पोलिसांनी रक्षकाची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त होते. मात्र पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेची लूट होताना दिसत आहे.
अवैध व्यवसाय पोसले जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मदत होईल, असे कृत्य केले जाते यामुळेच अशा मोठ्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. आता अवैध धंदे फोफावल्याचे विदारक चित्र आहे. मटका, हातभट्टी दारू, सौरट, गुटख्याला बंदी असतानाही गुटखा राजरोसपणे विकला जातोय, वाळू धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे पोलीस या गुन्ह्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. गावठी कट्टे विक्री, सोरट, मटका, बिंगो जुगार, गावठी दारू,चोऱ्या, लुटीच्या तयारीत असलेले टोळक्यांनी डोकं वर काढलं आहे.
खोटे गुन्हे दाखलचे प्रमाण वाढले
काहीवेळा तर प्रतिष्ठित व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढले आहे. त्याबद्दल देखील वरिष्ठस्तरावरून विचार होणे गरजेचे आहे. कारण खोटे गुन्हे दाखल होणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला नाहक मनस्ताप पोलिसांच्या गलथानपणामुळे सहन करावा लागतो.