विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष
अंतर्गत वादामुळे दिलेले शब्द पाळले जाणार का?
सुरेश डुबल
कराड – पालिकेत नुकताच झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आघाडीत भगदाड पडले. तसेच भाजपचे नगरसेवक व त्यांच्याच पक्षातील नगराध्यक्षांचा वाद चव्हाट्यावर आला. परिणामी येत्या 3 जानेवारी रोजी होणाऱ्या विषय समितीच्या निवडीवर याचा काही परिणाम होणार का? तसेच यापूर्वी एकमेकांना दिलेले शब्द या अंतर्गत वादामुळे पाळले जाणार का? या प्रश्नांमुळे इच्छुकांत घालमेल सुरु झाली आहे.
सतत राजकीय उलथापालथीमुळे येथील नगरपालिकाच जिल्ह्यात चर्चेचा विषय असते. 2016 साली कराड नगरपालिकेची निवडणूक पार पडली. यात पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार नगराध्यक्ष झाला. त्यांचे पाच नगरसेवकही निवडून आले. तसेच त्याआधी सत्ताधारी असलेल्या लोकशाही आघाडीला जनतेने साफ नाकारले. त्यांना फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सोळा जागा जिंकल्या. यात जे नगरसेवक निवडून आले.त्यातील अपवाद वगळता सर्वच नगरसेवकांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फारकत घेतली. आणि काही दिवसातच यशवंत-जनशक्ती- लोकसेवा या तिरंगी आघाडीची स्थापना झाली. आघाड्या एकत्र आल्या मात्र काही महिने उलटतात तोच, यांच्यात अंतर्गत कुरघोडी वाढत गेल्या. सुरुवातीला सार काही आलबेल होत. त्यामुळे विषय समित्यांच्या निवडी सहस्थायी समितीच्या निवडीमध्ये सकारात्मक फॉर्मुला वापरला गेला. आणि येणाऱ्या काळात ही सत्तेच समान वाटप करुन प्रत्येकाला संधी दिली जाईल. आता शब्दही आघाडीतील राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकांना दिला.
शब्द दिला तेव्हा आघाडीतील नगरसेवकांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कारणही तसंच होत, की पाच वर्षांच्या कार्यकाळात आपल्याला स्थायी समिती किंवा विषय समित्यांमध्ये स्थान निश्चित मिळेल. मात्र गेल्या मासिक सभेत पालिकेत बरेच मानापमान नाट्य पहावयास मिळाले. यात भाजप अंतर्गत वाद देखील जाहीर सभेत चव्हाट्यावर आला होताच. यासह अनपेक्षितपणे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्यासह पाच नगरसेवकांना घेऊन वेगळे झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे आघाडीतील राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकांना दिलेल्या शब्दाच काय? असा प्रश्न आघाडीतील नगरसेवकांना पडू लागला आहे.
येत्या 3 जानेवारीला पालिकेतील स्थायी समितीच्या तीन व विषय समितीच्या सात अशा दहा निवडी पार पडणार आहेत. या निवडी आधीच महिन्याभरापूर्वी पालिकेत झालेली सत्तेची भेळ मिसळ झाल्याचे पहावयास मिळते. आता या समित्यांच्या निवडीसाठी अवघे तीन दिवस बाकी असताना देखील आघाडीच्या नेत्यांमध्ये अजून कसलीही चर्चा झालेली नाही. यात काय चर्चा करायची, 10 मिनिटात निर्णय घेऊ, असे आघाडीतील प्रमुख म्हणत आहेत. मात्र सद्याचे पालिकेतील बलाबल पाहता निवडीमुळे जर काही नगसेवक जर नाराज झाले. तर ते आपला दल बदलू शकतात. त्यामुळे या निवडीत हलक्यात घेऊन सध्या तरी चालणार नाही.
ज्यांना मागील निवडीत पुढचा शब्द दिला होता, अशा इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र आघाडीत त्रांगडे झाल्याने जोवर निवडी होत नाही तोवर, या इच्छुकांमध्ये घालमेल सुरु झाली आहे. त्यामुळेच इच्छुक नगरसेवकांकडून स्थायी समितीसह विषय समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर अंदाज घेत चाचपणी सुरु केली आहे.