नागपूर – देशातील महत्वाच्या सार्वजनिक कंपन्या आपल्या मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालणारा देशातील सर्वात मोठा “डिलर’ व “ब्रोकर’चे काम करणाऱ्या भाजपने आधी केंद्रातून पायउतार होत राजीनामा द्यावा. राफेलमधील दलाली, नोटबंदीमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याच्या मोबदल्यात कोटयवधींची दलाली हे देशाच्या जनतेला माहित आहे, असे प्रत्युत्तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले.
नाना पटोले म्हणाले, “डीबीटी’ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना 1 जानेवारी 2013मध्ये कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारने सुरु केली. मात्र, त्याचे श्रेयही अमित शहा भाजपाला देत आहेत हे दुर्दैवी आहे. कॉंग्रेसच्या चांगल्या योजना स्वतःच्या नावावर खपवून बिनदिक्कतपणे खोटे बोलणे हे भाजपाची पद्धतच आहे.
देशातील सार्वजनिक बॅंका, विमानसेवा, विमानतळ, रेल्वे, रस्ते, विमा कंपनी हे खाजगी उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या “डिल’ कोणी केल्या. त्यासाठी “ब्रोकर’चे काम करत कोणी पैसे खाल्ले हे जनतेला माहित आहे. त्यामुळे आतातरी भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्याचे उद्योग थांबवावेत.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन निवडणुका घ्यावात हे अमित शहा यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांनी लोकशाहीचा सन्मान करायला शिकले पाहिजे. सत्तेच्या गुर्मीत असणारेच अशी वक्तव्ये करतात. महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्रातील भाजप सरकारही बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, मग पहा भाजपाविरोधात देशातील जनतेत किती असंतोष आहे हे तुम्हाला कळेल, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.