अंबाजोगाई:(प्रतिनिधी) महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने मृतांची संख्याही वाढली आहे. करोनाने आता ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. परिस्थिती भीषण होत चालली असून मृतदेहांची विल्हेवाट लावणं कठिण होत आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात मृतदेहांची विल्हेवाट लावतानाचे भीषण परिस्थिती समोर आली आहे.
शहरातील स्वाराती रुग्णालय आणि लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज शंभरच्या पुढे वाढत असताना मृत्यूदर देखील झपाट्याने वाढत आहे.
स्वाराती रुग्णालयात सात व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतदेहांना नगरपालिका प्रशासनाकडून मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग देण्यात आला. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अंबाजोगाईत मरण स्वस्त झाले असं म्हणण्याची वेळ आली आहे.