पुणे: राज्यात महिन्याभरापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले आहे. तसेच सततच्या पावसाने अनेक ठिकाणची कांदा लागवड लांबणीवर पडली होती. त्यामुळे कांद्याचे रोप खराब झाले होते. परंतु चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मिळेल त्या किमतीला रोप खरेदी करून लागवड केली. आता मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कांद्यावर मावा, अळी व करप्याचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.
तसेच सततच्या पडणाऱ्या धुक्यामुळे देखील कांदा पिकावर रोग पडत असल्याची परिस्थिती आहे. अगोदरच अधिक खर्च करून लागवड केली आणि आता या हवामान बदलामुळे महागड्या किमतीची औषधें फवारावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
सध्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता मावा पडून कांदे करपले असल्याने ते टिकवायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. अवकाळी पावसात देखील टॅग धरलेल्या कांद्यावर या हवामान बदलाचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातला शेतकरी या न त्या कारणाने संकटात सापडत असल्याची परिस्थिती आहे