सातारा -कास पठारावरील प्रदूषण टाळण्यासाठी पर्यटन विभागाच्या पुढाकाराने कास पठारावर ई बस सुरू करण्याचे नियोजन सध्या प्रस्तावित आहे. याच तयारीचा पहिला टप्पा म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी गुरुवारी ई बसमधून रपेट मारली. तसेच कास पठाराची पाहणी करून कार्यकारी समितीच्या सदस्यांशी त्यांनी चर्चा केली.
पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कास पठारावर ई बस सुरू करण्याचे नियोजन गतिमान झाले. या योजनेअंतर्गत पठारावर फुलांचा हंगाम पाहणाऱ्या पर्यटकांना ई बसमधून निसर्ग नजारा पाहण्याकरिता सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे पर्यटन विभागाचे नियोजन आहे. याकरिता पुणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने कास पठारावर दहा ई बस सेवा देण्याचे कबूल केले आहे. याकरिता गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पाहणी केली होती. गुरुवारी या पाहणीचा पुढचा टप्पा पार पडला. साताऱ्यातून कास पठारावर पहिली ई बस रवाना झाली. या ई बसची तांत्रिक माहिती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक बंसल यांनी घेतली. अटाळी ते कास पठार असा बस प्रवास जयवंशी आणि बंसल यांनी केला.
बसची यंत्रणा संपूर्णपणे इलक्ट्रिकल असल्याने प्रदूषण होण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कास पठार कार्यकारी समितीच्या सदस्यांची जयवंशी यांनी चर्चा केली. या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त स्थानिकांना कसे सामावून घेता येईल तसेच त्यांना प्रशिक्षित टुरिस्ट गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यासंदर्भातही प्राथमिक बोलणी झाली. शिवसेनेने साताऱ्यात शिवाजी संग्रहालय परिसरात ई चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासंदर्भात आंदोलन केले. यासंदर्भात सर्वसमावेशक चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, प्रशासन त्या दृष्टीने दक्ष आहे, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले.