स्वप्निल श्रोत्री
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्याचा गेल्या महिनाभरापासून प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या अनेक जागतिक माध्यमांनी दिलेल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय सीमेवरील चीनच्या घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. गलवान खोऱ्यात चीनच्या लष्कराने (पीएलए) ड्रोनद्वारे चीनचा राष्ट्रध्वज फडकावित सामूहिक राष्ट्रगीत गायल्याची घटना नुकतीच घडली. तसेच 1 जानेवारी 2022 पासून चीनने संमत केलेला नवीन सुरक्षा कायद्यानुसार चिनी सीमांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार लष्कराला देण्यात आले आहेत.
चीनच्या या आक्रमक धोरणामुळे गेल्या 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊनही भारत-चीन संबंधात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नसून परिस्थिती ही दिवसेंदिवस खराब होत आहे. दोन्ही देशांचे नेते आणि माध्यमांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले असून दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. अशा परिस्थितीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्याचा गेल्या महिनाभरापासून प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या अनेक जागतिक माध्यमांनी दिलेल्या आहेत.
डिसेंबर 2021 मध्ये भारत व रशिया यांच्यातील 2+2 संवादाच्या निमित्ताने भारतात आले होते तेव्हा पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर त्यांची नक्की काय बातचीत झाली याबाबतची पक्की माहिती नसली, तरी भारत-चीन संबंधात सुधारणा यावी आणि सीमेवरील तणाव कमी व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे समजते.
पंतप्रधान मोदी यांच्याशी केलेल्या
चर्चेनंतर पुतीन यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याचे समजते. यावेळी मोदींशी झालेल्या भेटीचा वृत्तांत त्यांनी शी जिनपिंग यांना दिल्याच्या बातम्या काही रशियन वृत्तपत्रांनी दिल्या आहेत. थोडक्यात, भारत व चीन या देशांमधील तणाव निवळण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे.
भारताची सहकार्याची भूमिका
किती आणि काही झाले तरी चीन हे भारताच्या शेजारील राष्ट्र आहे. बांगलादेश नंतर सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सीमा भारत आणि चीन यांच्यामध्ये आहे. त्यामुळे एका मर्यादेच्या बाहेर जाऊन चीनशी कटुता किंवा शत्रुत्व ठेवणे हे भारताच्या फायद्याचे नाही. त्यामुळे पुतीन यांनी मध्यस्थीचा प्रयत्न सुरू केल्यावर भारताने संपूर्ण सहकार्याची तयारी दर्शविली असली तरी जून 2019 पूर्वीची परिस्थिती (अर्थात मूळ परिस्थिती) जोपर्यंत सीमेवर होत नाही तोपर्यंत चीनशी “लेव्हल-1′ दर्जाची चर्चाही भारत करणार नाही, अशी अट भारताने घातली आहे.
चीनचा कुरघोडीचा प्रयत्न
कोणताही वाद किंवा संघर्ष तेव्हाच मिटू शकतो जेव्हा दोन्ही पक्षकार हे वाद मिटण्याची इच्छा बाळगून असतात. पुतीन हे भारत दौऱ्यावर येऊन अजून एक महिना उलटला नाही परंतु, या एका महिन्यात चीनने सीमेवर अनेकदा आगळीक करून भारताला जाणूनबुजून उसकविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. प्रामुख्याने त्यात सुरक्षा कायद्यानुसार लष्कराला अधिकार देणे असो किंवा गलवान खोऱ्यातील सामुदायिक राष्ट्रगीत गायन असो किंवा अरुणाचल प्रदेशच्या गावांना चिनी भाषेतील नाव देण्याचा प्रयत्न असो अशी उदाहरणे देता येतील.
सध्या भारताशी असलेला वाद मिटविण्यासाठी चीनची अजिबात इच्छा नसल्याचे दिसून येते आणि त्याला अनेक कारणे आहेत. चर्चा आणि मध्यस्थी ही दोन तुल्यबळ स्पर्धकांमध्ये होत असते. सध्या चीन सीमेवर अशा स्थितीत आहे जेथून चीनला संपूर्ण परिसरावर सहज ताबा मिळविणे शक्य आहे;
त्यामुळे सीमेवरील भौगोलिक परिस्थिती ही चीनला अनुकूल आहे. ज्यावेळी भारताने काही महत्त्वाच्या फिंगर्सवर ताबा मिळवला होता तेव्हा भारत हा चीनच्या वरचढ होता; त्यामुळे त्या काळात चीन हा चर्चेसाठी तयार असल्याचे दिसून आले होते. आज भारताकडे चीनला चर्चेच्या टेबलावर बसवून आपल्याला हवे ते काढून घेण्यासाठी कोणतेही “ट्रम्प कार्ड’ नाही. त्यामुळे चीन सीमेवर आगळीक करीत आहे.
रशियाला काय फायदा होणार?
रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. दुसरीकडे गेल्या काही वर्षांत रशिया व चीन संबंधात घनिष्ठ मैत्री झाल्याचे दिसून येते. सध्या रशिया आणि चीन या दोन्ही देशांचा अमेरिका शत्रू आहे. त्यामुळे “शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या उक्तीप्रमाणे ही दोन्ही राष्ट्रे एकत्र आली आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आयात करतो त्यामुळे उद्या जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर भारत रशियाकडे चीनविरोधात लढण्यासाठी शस्त्रांची मागणी करेल.
अशा वेळी भारताची मागणी जर पूर्ण केली तर चीन आपल्यावर नाराज होईल आणि जर नाही केली तर भारताशी संबंध कटू होतील ही भीती रशियाच्या मनात आहे. त्याशिवाय रशियातून चीनला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूची निर्यात होत असते. त्यामुळे चीनला नाराज करणे रशियाला आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. दुसरीकडे भारताशी संबंध खराब करून भारतासारखा मित्र अमेरिकेच्या हवाली करणे हे रशियासाठी राजकीयदृष्ट्या फायद्याचे नाही. त्यामुळे पुतीन हे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येते.
युद्धात जिंकून तहात अनेकदा हरल्याचा भारताचा इतिहास आहे. परंतु, सध्या चीनच्या बाबतीत भारत युद्ध आणि तह या दोन्ही गोष्टीत मागे असल्याचे चित्र आहे.
राष्ट्राच्या सीमा या शस्त्राने आखता येतात आणि शस्त्रानेच राखता येतात, असे वि. दा. सावरकरांनी म्हटले होते. आज भारताला लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत बाहेरच्या राष्ट्रांनी मदत करण्यापेक्षा आपण स्वतः इतके सक्षम असणे आवश्यक आहे की, बाहेरच्या राष्ट्राची गरजच लागली नाही पाहिजे. भारतात हे सर्व होण्यासाठी भारतीय राज्यकर्त्यांनी वायफळ बडबड न करता प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.