जिल्ह्यातील दहा मतदारसंघात सध्याची स्थिती
हानी न होण्यासाठी सर्वच पक्षांचा मातब्बरांकडे “ओढा’
– रोहन मुजूमदार
पुणे – तुम्हाला अनिल कपूर यांचा “नायक’ चित्रपट आठवतो का? त्यात अनिल कपूर तरुणपणात मुख्यमंत्री झाले अन् त्यांनी चेहरामोहरा बदला. हे केवळ चित्रपटाला शोभेल अशीच कथा होती. प्रत्यक्षात ती येऊ शकत नाही हे आतापर्यंत आपण पाहिले आहे. हे सोडा पण, सध्या तरुणाईच देश बदलू शकेल, असे म्हणून सर्वच पक्ष तरुणांना विविध पदांवर संधी देत आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही आमच्या पक्षातर्फे तरुण, तडफदार, नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल, असे आश्वासने सर्वच पक्षे देत आहेत.
मात्र, जिल्ह्यातील दहा मतदारसंघात सध्या ज्यांचे तिकीट “निश्चित’ समजले जात आहे, त्या सर्वांनी वयाची 40 ते 60 पार केलेली आहे. दरम्यान, पक्षात एखादे मोठे पद तरुणाईला देऊन आम्ही तरुणाईला संधी देत असल्याचा “आव’ सर्वपक्षीय आणून तरुणाईची मते पदरात पाडून घेण्यावर भर देत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. आता कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित नसला तरी सध्याच्या राजकीय वाऱ्यानुसार तरुणाईला (वय 25 ते 35) तिकीट मिळण्याची शक्यता “धूसर’च आहे.
जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, भोर-वेल्हे-मुळशी, शिरूर-हवेली, पुरंदर-हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ ही नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. यात जवळपास 30 ते 32 टक्क्यांपेक्षा अधिक तरुण मतदार आहेत. त्यामुळे या तरुणांची मतेच निर्णायक ठरणार असल्याचा विश्वास राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात तरुण-तडफदार व नवीन चेहरे आमदारकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून झालेले आऊटगोईंगमुळे या दोन्ही पक्षांची मोठी हानी झाली आहे. तरी जिल्ह्यात एखाद दुसरे बडे नाव सोडले तर छोटे-मोठेच मासे भाजप-शिवसेनेच्या “गळाला’ लागले आहेत. तर शिवसेनेची ताकद असली तरी भाजपनेही पाळेमुळे घट्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला ज्येष्ठ आणि मातब्बरांना संधी देण्याची नितांत गरज आहे. अन्यथा राज्यात झाली तशी स्थिती जिल्ह्यात होण्यास वेळ लागणार नाही. त्याचबरोबर तरुणांपेक्षा अनुभवी, मातब्बर नावांनाच संधी दिली तर शिवसेना, भाजपलाही “गड’ राखण्यात व नवीन “गड’ काबीज करता येईल, त्यामुळे या निवडणुकीत
तरी तरुण वयोगटातील चेहरा दिसणे कठीण मानले जात आहे.
अनुभव गरजेचा पण…
मतदारसंघाचा “गाडा’ हाकायचा म्हटलं म्हणजे त्यासाठी अनुभव गरजेचा असतो अशी सर्व मतदारांची अपेक्षा असते. त्यासाठी तरुणाईने अगदी कार्यकर्ता, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असे टप्पे पार केल्यावर मग आमदारकीच्या तिकिटासाठी तो “लायक’ ठरेल. हे जरी खरे असले तरी आताच्या “इन्स्टंट’ जमान्यात तरुणाई आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर व त्याच पक्षातील एखाद्या ज्येष्ठांच्या सहाय्याने मतदारसंघात बदल घडवू शकतो. मात्र, त्यासाठी त्याला एका संधीची नितांत गरज आहे. त्यामुळे अशी संधी जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात कोणता पक्ष देतो का, हे आगामी चार ते पाच दिवसांत स्पष्ट होईल.
सोशल मीडियासाठीच तरुणाईचा वापर
तरुणांना आकर्षित करण्यासाठी आज सारेच पक्ष सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. अर्थात, तरुणांना आकर्षित करायचे असेल तर सोशल मीडियावरील भाषा, पोस्टचा विषयदेखील तरुणांना रुचणारा हवा. अन्यथा केवळ पोस्ट टाकून त्याकडे कोणी पाहणार नाही आणि अपेक्षित परिणाम साधणारा नाही. त्यामुळेच की काय, पण सर्वच पक्षांची सोशल मीडिया सांभाळणारी जवळपास सारी टीम तरुणाईने व्यापलेली आहे. त्यामुळे सोशल मीडियासाठीच तरुणाईला हे राजकीय पक्ष जवळ करतात का? असा ही सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.