परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची लोकसभेत माहिती
नवी दिल्ली: पकिस्तानबरोबर भारताला सामान्य शेजारी देशाप्रमाणे संबंध अपेक्षित आहेत. सर्व प्रलंबित द्विपक्षीय विषयांवर पाकिस्तानबरोबर चर्चा करण्यास सरकार कटिबद्ध आहे. आता अर्थपूर्ण चर्चेसाठी पाकिस्तानकडून दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण केले जाण्यावर ही चर्चा अवलंबून आहे, असे परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लोकसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
सीमेपलिकडील दहशतवाद संपवण्यसाठी पाकिस्तानने ठाम आणि अपरिवर्तनीय पावले उचलावीत आणि आपल्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या संरचना उद्ध्वस्त कराव्यात. तोपर्यंत सीमेपलिकडील दहशतवाद्यांची घुसखोरी आणि पाकिस्तानच्या सैन्याकडून होणाऱ्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात राहिल. मात्र दहशतवाद मुक्त वातावरण, शत्रुत्व आणि हिंसाचारमुक्त वातावरणातच अर्थपूर्ण चर्चा होऊ शकते, असेही ते म्हणाले.
दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठीच भारताने सप्टेंबर 2016 मध्ये “सर्जिकल स्ट्राईक’ आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये बालाकोट इथे दहशतवाद्यांच्या अड्डयांवर “एअर स्ट्राईक’ केला होता. सीमापार व्यापारीमार्गाचा गैरवापर केला जात असल्याच्या आरोपावरून भारताने एप्रिलमध्ये हा व्यापारी मार्गही स्थगित केला. पुलवामा हल्ल्याचा आंतरराष्टीय समुदायाकडून निषेध झाल्यावर संयुक्त राष्ट्राच्या 1267 नियमाद्वारे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राकडून जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले. जमात उद दावा, लष्कर ए तोयबा आणि फलाह ए इन्सानियत फौंडेशनसारख्या संघटनांवर कारवाईसाठी “एफएटीए’ने पाकिस्तानला करड्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला आहे. पाकिस्तानने भारताला हवाई हद्दीची बंदी अलिकडेच उठवली अहे, अशी महितीही मंत्र्यांनी दिली.